
देशातील अनेक राज्यांत पावसाचा जोर कायम; उत्तर प्रदेशातील 63 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून देशातील अनेक भागांत पावसाने दमदार हजेरी लावली आहे. उत्तर प्रदेशात मान्सूनचा हंगाम पूर्णपणे सक्रिय झाला आहे. सोमवारी, उत्तर प्रदेशच्या पूर्व आणि पश्चिम दोन्ही विभागांमध्ये मुसळधार पाऊस झाला. विशेषतः बरेली, लखीमपूर खेरी, रामपूर आणि शाहजहानपूरसारख्या जिल्ह्यांमध्ये पावसाने चांगलाच जोर धरला.
संततधार पावसामुळे राज्यातील बहुतांश भागांमध्ये तापमान लक्षणीयरीत्या कमी झाले असून, दमटपणा आणि उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे. प्रादेशिक हवामान केंद्राने मंगळवारसाठी १८ जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे, तर इतर ४५ जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. एकूण ६३ जिल्ह्यांमध्ये पाऊस किंवा मुसळधार पावसाची शक्यता आहे. याव्यतिरिक्त, अंदाजे ६० जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस आणि विजांचा इशारा देण्यात आला आहे.
सोमवारी तराईच्या अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला. बरेलीमध्ये सर्वाधिक १७४ मिमी पावसाची नोंद झाली. यानंतर, लखीमपूर खेरीमध्ये १६० मिमी, रामपूरमध्ये १५२ मिमी आणि शाहजहानपूरमध्ये १५०.३ मिमी पावसाची नोंद झाली. राज्यातील इतर अनेक जिल्ह्यांमध्येही हलका ते मध्यम पाऊस झाला.
राज्यात पुढील दोन दिवस हलका ते मध्यम पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होण्याचीही शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
जुलैमध्ये पाऊस सामान्य पातळीवर
उत्तर प्रदेशातील मान्सूनच्या पावसाने जुलै महिन्यातील पावसाची तूट भरून काढली आहे. २० जुलैपर्यंत राज्यात १६०.५ मिमी पावसाची नोंद झाली, तर या कालावधीसाठी सामान्य आकडेवारी १७०.३ मिमी आहे. याचा अर्थ आतापर्यंत केवळ सहा टक्के कमी पाऊस झाला आहे, जो हवामान विभागाच्या मते सामान्य श्रेणीत येतो. प्रादेशिक हवामान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ यांनी सांगितले की, राज्यातील मान्सूनची स्थिती सध्या तरी सामान्य आहे.
ऑरेंज अलर्ट कोणत्या जिल्ह्यात?
बांदा, फारुखाबाद, कन्नौज, कानपूर देहत, अलीगढ, मथुरा, हाथरस, कासगंज, एटा, आग्रा, फिरोजाबाद, मैनपुरी, इटावा, औरैया, जालौन, हमीरपूर, महोबा, झाशी आणि आसपासच्या परिसरात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.