
१८ ऑगस्टपर्यंत पावसाची शक्यता;
नवी दिल्ली : देशातील अनेक राज्यांत मुसळधार पावसाने अक्षरश: कहर केला आहे. पाऊस आणि त्यानंतर झालेल्या भूस्खलनामुळे देशाच्या अनेक भागांमध्ये अडचणी वाढल्या आहेत. मुंबईत भूस्खलनात सात जणांचा मृत्यू झाला आहे, तर हिमाचलमध्ये 313 रस्ते बंद आहेत आणि 30 जूनपासून 75 जणांचा मृत्यू झाला आहे. मुसळधार पावसाचा परिणाम ओडिशा, जम्मू आणि काश्मीर आणि राजस्थानवरही होत आहे. हवामान खात्याने अनेक भागांमध्ये सतर्कतेचा इशारा दिला आहे.
देशभरातील अनेक राज्यांमध्ये सततच्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. काही भागांमध्ये भूस्खलन झाल्याने रस्ते आणि मार्ग बंद झाले आहेत. मुंबईतील घाटकोपरमध्ये डोंगराचा मलबा तीन घरांवर कोसळल्याने सात जणांचा मृत्यू झाला आहे. हिमाचल प्रदेशात ३१३ रस्ते बंद असून, ३० जूनपासून राज्यात पाऊस आणि हवामानाशी संबंधित आपत्तींमध्ये ७५ लोकांचा मृत्यू झाला आहे. १८ ऑगस्टपर्यंत जारी केलेल्या हवामान इशाऱ्यांमुळे चिंता वाढली आहे.
Rain Update : देशातील 19 राज्यांमध्ये मुसळधार पावसासह वादळाचा इशारा; महाराष्ट्रासह राजधानी दिल्लीत…
बुधवारी पहाटे चारच्या सुमारास मुंबईच्या घाटकोपर भागातील गौसिया चाळीत भूस्खलन झाले. डोंगराचा काही भाग आणि ढिगारा तीन घरांवर पडला. जखमींना रुग्णालयात नेण्यात आले, जिथे तीन मुलांसह सहा जणांना मृत घोषित करण्यात आले. रमेश यादव यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या दुर्घटनेत सात जण जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी बचाव कार्याचा आढावा घेण्यासाठी घटनास्थळाला भेट दिली आणि मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ४ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली.
19 राज्यांमध्ये मुसळधार पावसासह वादळाचा इशारा
ओडिसा, झारखंड यांसारख्या राज्यांत पावसाने अक्षरश: कहर केला आहे. मुसळधार पाऊस त्यानंतर आलेल्या पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यातच आता देशातील 19 राज्यांमध्ये मुसळधार पाऊस, मेघगर्जना आणि सोसाट्याच्या वाऱ्याचा इशारा देण्यात आला आहे. काही भागांमध्ये वाऱ्याचा वेग ताशी 90 किमीपर्यंत पोहोचू शकतो.
रस्ते वाहतुकीवर होणार परिणाम
दिल्लीसाठी मुसळधार पाऊस आणि मेघगर्जनेचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, वारे ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वाहू शकतात. कमाल तापमान सुमारे ३६ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २९ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. पावसादरम्यान रस्त्यांवर पाणी साचण्याची आणि वाहतुकीत व्यत्यय येण्याची शक्यता आहे.