जयपूर : राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा (Bhajan Lal Sharma) आणि कॅबिनेट मंत्री किरोरी लाल मीना (Kirori Lal Meena) यांच्यात सर्व काही आलबेल असल्याचे दिसत नाही. किरोरी लाल यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून आपल्याच सरकारविरोधात आघाडी उघडली आहे. पत्रात त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. किरोरी लाल यांनी थेट मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला नसला तरी खुद्द मुख्यमंत्री भजनलाल हेच लक्ष्य असल्याचे मानले जात आहे.
जयपूरमधील गांधीनगर येथील जुन्या एमआरईसी कॅम्पस आणि सरकारी वसाहतीच्या पुनर्विकास योजनेच्या नावाखाली काम सुरु आहे. पीपीपी मॉडेलवर बहुमजली इमारत बांधण्याच्या प्रकल्पात 1,146 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याची शक्यता किरोरी लाल मीना यांनी व्यक्त केली आहे. मीना यांनी पत्र लिहून या प्रकल्पातील काही अधिकाऱ्यांवर आरईडीसीसीसोबत संगनमत करून काळा पैसा कमावल्याचा आरोप केला आहे.
यापूर्वीही त्यांनी भजनलाल शर्मा यांना जलजीवन मिशनमधील घोटाळा आणि हेराफेरीबाबत पत्र लिहिले होते. सध्याच्या सरकारला विश्वासात न घेता एमआरईसी कॅम्पस आणि सरकारी वसाहतीची पुनर्विकास योजना राबविणे हा स्वार्थ आणि काही अधिकाऱ्यांची मिलीभगत आहे. या प्रकरणाचा संपूर्ण आर्थिक तपास आणि विविध मुद्यांची चौकशी व्हावी, तोपर्यंत ही योजना राबविण्यास बंदी घालावी, अशी मीना यांची मागणी आहे.






