पाकिस्तान, अफगाणिस्तान,बांग्लादेशातून आलेल्या नागरिकांसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय
केंद्र सरकारने शेजारील पाकिस्तान, बांग्लादेश आणि अफगाणिस्तानातून भारतात आलेल्या हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी आणि ख्रिश्चन समुदायांच्या नागरिकांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. धार्मिक छळापासून वाचण्यासाठी ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत अफगाणिस्तान, बांगलादेश आणि पाकिस्तानमधून भारतात आलेल्या हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी आणि ख्रिश्चन समुदायाच्या सदस्यांना पासपोर्ट किंवा इतर प्रवास कागदपत्रांशिवायही देशात राहण्याची परवानगी दिली जाणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
वृत्तसंस्था पीटीआयच्या वृत्तानुसार, गेल्या वर्षी देशात लागू करण्यात आलेल्या नागरिकत्व (सुधारणा) कायद्यानुसार (सीएए) ३१ डिसेंबर २०१४ रोजी किंवा त्यापूर्वी भारतात आलेल्या या छळग्रस्त अल्पसंख्याकांना भारतीय नागरिकत्व दिले जाणार आहे. अलीकडेच लागू झालेल्या इमिग्रेशन अँड फॉरेनर्स (नागरिकत्व) कायदा, २०२५ अंतर्गत जारी केलेल्या या महत्त्वाच्या आदेशामुळे २०१४ नंतर भारतात आलेल्या आणि त्यांच्या भविष्याबद्दल चिंतेत असलेल्या विशेषत: पाकिस्तानातून मोठ्या संख्येने येणाऱ्या हिंदूं नागरिकांना दिलासा मिळणार आहे.