
Rahul Gandhi, Amit Shah, Lok Sabha, Parliament Session
Rahul Gandhi In Lok Sabha: देशातील पेपरलीक प्रकरण, सीजेपी विद्यार्थी आंदोलन, लाठीचार्ज आणि राममंदिर दान चोरी यांसारख्या प्रकरणामुळे संसदेच्या पावसाळी अधिवेशन दणाणून गेले आहे. विरोधी इंडिया आघाडीने सत्ताधारी भाजप सरकार घेरण्याची एकही संधी सोडली नसल्याचे दिसत आहे. खास बाब म्हणजे जंतरमंतरवर विद्यार्थ्याच्या आंदोलनादरम्यान झालेल्या लाठीचार्जवरून विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज याच मुद्द्यावरून थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांवर गंभीरआरोप केल्याचे पाहायला मिळाले.
पेपरफुटीशी संबंधित ‘परीक्षा सुधारणा विधेयक, २०२६’ वरील चर्चेदरम्यान, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लोकसभेत एक असे वक्तव्य केले, ज्यामुळे सत्ताधारी पक्षाच्या खासदार चांगलेच भडकले होते. गेल्या आठवड्यात झालेल्या विद्यार्थ्याच्या संसद मार्चदरम्यान शेकडो विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करण्यात आला. अनेक ठिकाणी पॅलेटगन आणि गोळीबाराच्याही घटना उघडकीस आल्या. याच मुद्द्यावरून राहुल गांधींनी थेट, “गृहमंत्री अमित शाह यांनी विद्यार्थ्यांवर गोळीबार करण्याचे आदेश दिले होते.” असा गंभीर आरोप केला आहे.
राहुल गांधी म्हणाले की, “गृहमंत्री अमित शाह यांच्यात सभागृहात येऊन बसण्याचे धाडस नाही. मी त्यांना ३० गाड्यांच्या ताफ्यात थरथर कापत बसलेले पाहिले. गृहमंत्री आज इथे का नाहीत? अमित शाह यांनी विद्यार्थ्यांवर गोळीबार करण्याचे आदेश दिले होते.” राहुल गांधीच्या या आरोपांमुळे सभागृहात एकच गोंधळ उडाला. सत्ताधारी भाजप खासदारांनी राहुल गांधींकडे माफी मागावी, अशी मागणी केली.
राहुल गांधी म्हणाले, “मी काही विद्यार्थ्यांशी बोललो मी त्यांना विचारले की विद्यार्थी असण्याचा अर्थ काय असतो. त्या मुलीने एक सुंदर उत्तर दिले. ती म्हणाली, ‘विद्यार्थी म्हणजे अशी व्यक्ती, जिचे मन आणि हृदय खुले असते. विद्यार्थ्यांना माहित असते की त्यांना अजून शिकायचे आहे आणि हे विश्व सतत बदलत असते. त्यामुळे, त्यांचा असा विश्वास असतो की ज्ञानही सतत बदलत असते.” असं उत्तर विद्यार्थ्यांनी दिल्याचे त्यांनी सांगितले.
“एक विद्यार्थीनी म्हणाली, काही लोक विद्यार्थी नसतात; त्यांचा पूर्ण विश्वास असतो की त्यांना सर्व काही माहित आहे आणि ज्ञान आतून येते. ते स्वतःला देव मानतात. ते अहंकारी असतात आणि कोणाचेही ऐकत नाहीत. ते इतरांच्या सत्याचा आदर करत नाहीत.” असा टोलाही राहुल गांधींनी लगावला. यामुळे सभागृहात मोठा गदारोळ झाला. यानंतर राहुल गांधींचे हे वक्तव्य आक्षेपार्ह असल्याचा सांगत माफी मागण्यास सांगितले.
भाजपच्या गदारोळात, राहुल गांधी म्हणाले की, “ते आता बोलणार नाहीत आणि खाली बसले, तेव्हा संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी त्यांना तो शब्द न वापरण्याची आणि आपले भाषण सुरू ठेवण्याची विनंती केली.”
दरम्यान, जंतर मंतर येथील कॉकरोच जनता पक्षाच्या आंदोलनाबाबत राहुल गांधी म्हणाले, “मी खूप उत्साहित झालो होतो. देशाच्या भविष्याने आपल्या रस्त्यांवर जे दाखवून दिले, त्याने माझा आत्मविश्वास वाढवला. हा राग नव्हता, हिंसा नव्हती, द्वेष नव्हता. ही या देशातील तरुणांची, या देशाच्या भावी पिढीची एक सखोल अभिव्यक्ती होती. भाजपमधील माझ्या मित्रांसहित सर्व राजकीय पक्षांनी या अभिव्यक्तीचा आदर केला पाहिजे.” असही राहुल गांधींनी नमुद केलं.
तसेच, भाजपमधील माझ्या मित्रांनी जर त्यांच्या मुलांना विचारले की, सीजेपीच्या आंदोलनातील विद्यार्थ्यांनी जे केले त्याबद्दल त्यांना कसे वाटते, तर त्यांच्या मुलांमध्येही एकमत दिसून येईल. जे घडले त्यात काहीही चुकीचे नाही आणि प्रत्येक भारतीयाला त्याचा अभिमान वाटला पाहिजे.” असंही राहुल गांधींनी सांगितलं.