नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पाच टप्प्यातील मतदान आत्तापर्यंत पूर्ण झाले आहे. ही निवडणूक सात टप्प्यात होत असल्याने निम्म्यापेक्षा अधिक टप्पे झाले आहेत. त्यामुळेच आता निवडणुकीत कोण विजयी होणार याबद्दल अंदाज व्यक्त केले जात आहेत. निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांनी मोदींच्या नेतृत्वाखाली एनडीए तिसऱ्यांदा सरकार स्थापन करेल, असा दावा केला.
अनेक निवडणुकांमध्ये आपलं स्वत:चं भाकित वर्तवणाऱ्या प्रशांत किशोर यांनी आताही अंदाज व्यक्त केला आहे. ते म्हणाले, ‘भाजप यावेळीही 2019 इतक्या 303 जागांच्या जवळपास किंवा त्याहून अधिक जागा जिंकू शकते. मोदींच्या नेतृत्वाखालील भाजप सत्तेत परत येताना दिसत आहे. त्यांना मागच्या वेळी मिळाल्या तेवढ्या किंवा त्याहून काहीशा जास्त जागा मिळू शकतात. भाजपच्या 370 जागांच्या टार्गेटबद्दल विचारले असता प्रशांत किशोर म्हणाले की, जर भाजपने 275 जागा जिंकल्या, तर त्यांचे नेते आम्ही सरकार बनवणार नाही, कारण आम्ही 370 जागा जिंकण्याचा दावा केला होता असे म्हणणार नाहीत’.
तसेच ते पुढे म्हणाले, ‘आपल्याला हे पाहावे लागेल की भाजप बहुमताचा आकडा पार करत आहे की नाही. पण मला वाटत नाही की भाजपला सत्तेत परत येण्यासाठी कोणताही धोका आहे. इतकंच नाही तर प्रशांत किशोर यांनी भाजपचा 370 जागा जिंकण्याचा दावा स्मार्ट मूव्ह असल्याचे म्हटले आहे. यामुळे निवडणुकीची चर्चा बदलली’.






