
Nitin Gadkari: २०१६ पूर्वीच्या गाड्या अन् E20 पेट्रोल! (Photo Credit- X)
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOC), इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोलियम (IIP), ‘सियाम’ (SIAM) आणि ‘एआरएआय’ (ARAI) या देशोदेशीच्या प्रमुख संस्थांनी केलेल्या व्यापक अभ्यासाचा संदर्भ गडकरींनी दिला.
ई-२० इंधनामुळे वाहनांचे मायलेज कमी होत असल्याच्या मुद्द्यावर बोलताना गडकरी म्हणाले की, वाहनाचे मायलेज हे केवळ इंधनावर अवलंबून नसून गाडीची स्थिती, चालवण्याची पद्धत आणि रस्ते अशा विविध घटकांवर अवलंबून असते.
त्यांनी नमूद केले की, २६ डिसेंबर २०२० रोजी नीती आयोगाद्वारे स्थापन करण्यात आलेल्या आंतर-मंत्रालयीन समितीने पेट्रोलमधील इथेनॉल मिश्रणाशी संबंधित सर्व पैलूंचा—जसे की वाहनांची सुसंगतता, मायलेज आणि इंधन कार्यक्षमता—सखोल अभ्यास केला होता. या समितीच्या निष्कर्षांना इंडियन ऑईल, ARAI आणि SIAM यांनी केलेल्या अभ्यासांचीही पुष्टी मिळाली. गडकरी यांनी सांगितले की, E20 ची अंमलबजावणी करण्यापूर्वी जून २०२१ मध्ये ‘भारतातील इथेनॉल मिश्रणासाठीचा रोडमॅप २०२०-२५’ (Roadmap for Ethanol Blending in India 2020-25) हा समितीचा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला होता.
वाहन कंपन्या, तेल विपणन कंपन्या आणि कृषी तज्ञांशी सल्लामसलत केल्यानंतर, या अहवालात सामग्रीची सुसंगतता, इंजिन कॅलिब्रेशन, इंधन प्रणाली, चालवण्याची सुलभता, टिकाऊपणा, उत्सर्जन आणि इंधन कार्यक्षमता यांसारख्या पैलूंचे सविस्तर मूल्यांकन सादर करण्यात आले. त्यांनी नमूद केले की, इथेनॉल मिश्रित पेट्रोल (EBP) कार्यक्रम टप्प्याटप्प्याने, वैज्ञानिकदृष्ट्या प्रमाणित आणि सर्वसमावेशक सल्लामसलतीवर आधारित प्रक्रियेद्वारे राबविण्यात आला आहे. गडकरी यांनी हे देखील निदर्शनास आणून दिले की, जगभरातील अनेक देशांमध्ये शंभर वर्षांहून अधिक काळापासून इथेनॉल-मिश्रित इंधन वापरात आहे आणि ब्राझीलसारखे देश अनेक दशकांपासून त्याहूनही अधिक इथेनॉल मिश्रण असलेली इंधने यशस्वीपणे वापरत आहेत.