
पुणे : किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून कर्ज घेण्यासाठी शेतकऱ्यांचा बँकांकडून होणारा जाच आता कमी होणार आहे. केंद्र सरकारने देशातील केवळ दोनच जिल्ह्यांमध्ये एक अनोखा प्रयोग राबविण्याचे ठरविले आहे. ॲग्री स्टॅक या ॲपच्या माध्यमातून केवळ एका क्लिकवर आणि दहा मिनिटांमध्येच दीड लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मंजूर होणार असून, ते विनातारण थेट शेतकऱ्यांच्या खात्यातही जमा होणार आहे. महाराष्ट्रातील बीड व उत्तर प्रदेशातील फारुखाबाद या जिल्ह्यांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर हा प्रकल्प येत्या मेपासून राबविण्यात येत आहे.
या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्डच्या मदतीने कर्ज पुरवठा करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना अवघ्या दहा मिनिटांत कर्ज देण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. त्यासाठी ॲग्री स्टॅक ॲप मदतीला येईल. या ॲपच्या मदतीने दहा मिनिटांतच 1.5 लाख रुपयांचे कर्ज मिळेल. विशेष म्हणजे या कर्जासाठी शेतकऱ्यांना काहीही तारण ठेवावे लागणार नाही. हे कर्ज त्यांना विनातारण मिळेल. प्रायोगित तत्वावर हा प्रयोग राज्यातील बीड जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. मे महिन्यापासून याप्रकल्पाचा श्रीगणेशा जिल्ह्यात सुरु होत आहे.
एकाच ॲपवर पिकांची नोंदणी
किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून कर्ज देण्यासाठी ॲग्री स्टॅक ॲप विकसीत करण्यात आले आहे. आता देशातील पिकांच्या नोंदणीसाठी सुद्धा एकच ॲप विकसीत करण्यात येत आहे. हा पण एक अनोखा प्रयोग आहे. येत्या खरीप पिकांपासून देशातील सर्व पिकांची माहिती या ॲपमध्ये नोंदविण्यात येणार आहे. विशेष म्हणजे पिकांची अचूक माहिती शेतकऱ्यांनीच या ॲपच्या माध्यमातून नोंदवायची आहे.