
अयोध्या | अयोध्येमध्ये (Ayodhya) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी 30 डिसेंबर रोजी विविध विकासकामांचे लोकार्पण केले. यावेळी त्यांनी रोड शो करत शक्तीप्रदर्शन देखील केले. याच दरम्यान पंतप्रधान मोदी यांनी उज्ज्वला योजनेच्या (Ujjwala Yojana) 10 कोटी व्या लाभार्थी मीरा मांझी यांच्या घरी अचानक भेट दिली. तसेच त्यांचा घरी चहापाणी घेतला. यानंतर आता पंतप्रधान मोदी यांनी मीरा मांझी यांच्या कुटुंबाला पत्र लिहित त्यांच्याबद्दल भावना व्यक्त केल्या आहेत. तसेच काही भेटवस्तू देखील पाठवल्या आहेत. मोदी यांनी पत्रामध्ये नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अयोध्येमध्ये पंतप्रधान मोदी यांचे पत्र चर्चेचा विषय ठरला आहे.
अयोध्या धाम रेल्वे जंक्शन (Ayodhya Dham Railway Junction) तसेच विमानतळाचे उद्घाटन करायला आलेल्या पंतप्रधान मोदींनी मीरा मांझी यांच्या घरी भेट दिली. पंतप्रधानांनी अचानक भेट दिल्यानंतरही मीरा यांनी मोदींना चहा दिला. या प्रसंगानंतर पंतप्रधान मोदी यांनी देखील मीरा मांझी यांना पत्र लिहिले आहे. यामध्ये नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत त्यांच्या मुलांसाठी शैक्षणिक साहित्य व काही खेळणी भेटवस्तू म्हणून दिल्या आहेत. याबाबत मीरा मांझी यांनी माहिती देत त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
पतीला नोकरी देण्याची मीरा मांझी यांची विनंती
माध्यमांना प्रतिक्रिया देताना मीरा मांझी म्हणाल्या, “मला खूप छान वाटलं. त्यांनी पत्राद्वारे नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. आमच्या मुलांचा हा सन्मान आहे. त्यांनी एक पत्र पाठवलं आहे. यावेळी आम्ही फार आनंदात असून खूप छान वाटत आहे. मलाच नव्हे तर मांझी नगरसाठी त्यांनी हे पत्र लिहिलं आहे. लहान मुलांना बॅग, पेन्सिल, टिफीन असं शैक्षणिक साहित्य त्यांनी पाठवलं आहे. आता त्यांनी माझ्या पतीला लहान-मोठी नोकरी द्यावी. त्यामुळे माझ्या मुलांचं भविष्य सुरक्षित होईल” अशा भावना मीरा मांझी यांनी माध्यमांसमोर व्यक्त केल्या आहेत.
पंतप्रधानांनी पत्रामध्ये व्यक्त केल्या भावना
‘तुम्हाला आणि तुमच्या परिवारातील सर्व सदस्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. प्रभू श्रीरामाच्या पावन नगरीत अयोध्येत तुम्हाला आणि तुमच्या परिवाला भेटून आणि तुमच्या हाताचा चहा पिऊन फार प्रसन्न वाटलं.
अयोध्येतून आल्यानंतर मी अनेक टीव्ही चॅनेलवर तुमच्या मुलाखती पाहिल्या. यामध्ये तुम्ही आणि तुमचा परिवारातील सदस्यांनी आत्मविश्वास आणि जितक्या सहजतेने तुम्हाला आलेला अनुभव शेअर केला हे पाहून छान वाटलं. तुमच्यासारख्या कोट्यवधी कुटुंबातील सदस्यांच्या चेहऱ्यावर असंच हासू ठेवणं ही माझी संपत्ती आहे. तुमच्यामुळेच मला देशासाठी मनापासून काम करण्याची ऊर्जा मिळते.
उज्ज्वला योजनेचे १० कोटी वा लाभार्थी बनणं हा फक्त एक आकडा नाही, तर देशातील मोठ्या मोठ्या स्वप्नांना आणि संकल्पांना पूर्ण होण्याच्या उद्देशाने हे पाहतो.
मला पूर्ण विश्वास आहे की अमृत कालमध्ये तुमच्या सारख्या आकांक्षांनी परिपूर्ण कोट्यवधी देशवासियांचा उत्साह विकसित भारत निर्माणासाठी महत्त्वाची भूमिका बजावतील. मुलांच्या चांगल्या स्वास्थ्या आणि उज्ज्वल भविष्याची मी प्रार्थना करतो’