ABVP Students Protest JPSC News : रांचीत विद्यार्थी आंदोलन पेटले!; मुख्यमंत्री निवासावर ABVP चा मोर्चा, पोलिसांशी झटापट
मुख्यमंत्री निवासाकडे जाणाऱ्या ABVP कार्यकर्त्यांच्या विद्यार्थ्यांचा मोर्चा रांची पोलिसांनी अडवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी काही आंदोलकांनी रस्त्यावर झोपून निषेध नोंदवला, तर काही कार्यकर्ते पोलिसांच्या वाहनावर चढल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे पोलिस आणि आंदोलकांमध्ये काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते
पोलिस उपअधीक्षक अजय आर्यन म्हणाले की, मुख्यमंत्री निवासाजवळ ABVP कार्यकर्त्यांची पोलिसांशी झटापट झाली. आंदोलकांनी बॅरिकेड तोडण्याचाही प्रयत्न केला. या प्रकरणात 8 ते 10 कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले. या सर्व कार्यकर्त्यांना लालपूर पोलिस ठाण्यात नेले जाईल.
ABVPचे कार्यकर्ते डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी विद्यापीठातून मुख्यमंत्री निवासाच्या दिशेने मोर्चा निघाला होता. संभाव्य अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांनी आंदोलकांना सिदो-कान्हू पार्कजवळ रोखल्याचे अजय आर्यन यांनी सांगितले. ताब्यात घेतलेल्या ABVPच्या एका कार्यकर्त्याने विद्यार्थ्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण आमचा संघर्ष सरकार आणि त्याच्या धोरणांविरोधात आहे. गेल्या दोन आठवड्यांहून अधिक काळ झारखंडमधील विद्यार्थी आणि नोकरी इच्छुक उमेदवार जयपाल सिंह मुंडा स्टेडियममध्ये आंदोलन करत आहेत. 14व्या झारखंड लोकसेवा आयोगाच्या (JPSC) प्राथमिक परीक्षा (PT) रद्द करण्याची त्यांची प्रमुख मागणी आहे. मात्र, राज्य सरकार त्यांच्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याचा आरोप ABVPने केला.
ABVP ने दिलेल्या माहितीनुसार, भरती परीक्षांमधील कथित अनियमिततेविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला. विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी ABVP कडून केली जात आहे. झारखंडमधील भरती परीक्षांमधील कथित गैरप्रकारांविरोधातील विद्यार्थ्यांचे आंदोलन शनिवारी 15व्या दिवशीही सुरू होते. राज्य सरकार आणि आंदोलक विद्यार्थ्यांमध्ये चर्चा होऊनही अद्याप तोडगा निघालेला नसल्याने आंदोलन सुरूच आहे.






