काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह उघड, शशी थरुर म्हणाले, “माझ्याच पक्षातले लोक मला…”
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि तिरुवनंतपुरमचे खासदार शशी थरुर सध्या चर्चेत आहेत ते पक्षविरोधी भूमिकेमुळे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एलडीएच्या केरळमधील सरकारचं त्यांनी जाहीर कौतुक केलं होतं. राहुल गांधींनी त्यांना तातडीने दिल्लीलाही बोलावून घेतलं होतं. शशी थरुर काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊ शकतात अशी चर्चाही सध्या रंगली आहे. पक्षांतर्गत राजकीय मतभेद आणि कलह सुरू असल्याने शशी थरुर काँग्रेसमधून बाहेर पडतील अशी चिन्हं आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर त्यांनी एका राष्ट्रीय वृत्तपत्रात दिलेल्या मुलाखतीत यावर भाष्य केलं आहे.
“मी एक उदारमतवादी माणूस आहे. मी जातीयतेचा विरोध दर्शवणारा माणूस आहे. आर्थिक विकास झाला पाहिजे आणि समाजातल्या तळागाळातील माणसाला न्याय मिळाला पाहिजे अशी माझी भूमिका कायमच राहिली आहे. भारतात लोकशाही पद्धत आहे आणि मी त्या लोकशाहीचा सन्मान करतो.” असं शशी थरुर यांनी म्हटलं आहे.
शशी थरुर म्हणाले, “माझ्याच पक्षातील काही लोक माझ्या विरोधात आहेत. मात्र मला भारत आणि केरळ यांच्या भविष्याबाबत बोलायला आवडतं. माझ्याच पक्षातले लोक माझ्यावर टीका करत आहेत. मात्र मी काँग्रेस पक्ष सोडलेला नाही. काँग्रेसबाबत असलेली माझी निष्ठा कायम आहे. जर पक्षाने मला मोठी जबाबदारी दिली तर ती स्वीकारण्यासही मी तयार आहे. माझ्या राजकीय भविष्याविषयी म्हणत असाल तर मी तसा फारसा विचार केलेला नाही. पण सार्वजनिक जीवनात मी समाजसेवा करण्यावर भर देईन.” असं थरुर यांनी म्हटलं आहे.
मी कायमच एक क्लासिक उदारमतवादी माणूस म्हणून काम करत आलो आहे. सध्या माझं आयुष्य सुरळीत सुरु आहे. माझ्या पत्नीच्या निधनानंतर माझ्या आईने मला लग्न कर असंही सांगितलं. मात्र मी समाधानी आहे जे काही चाललं आहे ते व्यवस्थित चाललं आहे, असंही थररुर यांनी म्हटलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पिनराई विजयन यांच्या लेफ्ट ड्रेमोक्रॅटिक फ्रंट सरकारचं थरूर यांनी कौतुक केलं होतं. त्यावर बोलताना ते म्हणाले की, मी माझी मते रोखठोकपणे मांडत आलो आहे. मग ते देशाच्या किंवा केरळच्या विकासासाठी असो. माझ्यासारख्या राजकारण्याने राजकीय विचारांच्या बाबीत लहान विचार करून चालणार नाही. त्यामुळेच मला जे चांगले वाटते, त्याबद्दल मी मोकळ्या मनाने बोलतो, मग काँग्रेस पक्ष त्या गोष्टीच्या विरोधात का असेना, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली आहे.