
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीनंतर सरकार स्थापनेचे प्रयत्न सुरू झाले आहेत. सर्वांत मोठा पक्ष भाजप-एनडीएची पहिली बैठक पंतप्रधानांच्या निवासस्थानी झाली. यामध्ये सरकार स्थापनेशी संबंधित निर्णयावर चर्चा करण्यात आली.
या बैठकीत जेडीयूचे नेते आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, टीडीपीचे प्रमुख चंद्राबाबू नायडू, एजेएसयू प्रमुख सुदेश महतो, आरएलडीचे जयंत चौधरी, जनसेना पक्षाचे प्रमुख पवन कल्याण, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, लोजप (रामविलास) नेते चिराग पासवान, अपनांचे नेते उपस्थित होते. अपना दल (सोनेलाल) नेत्या अनुप्रिया पटेल आणि हमचे नेते जीतन राम मांझी यांचा समावेश आहे.
शपथविधी 8 जूनला ?
मंत्रिमंडळ बैठकीत निवडणुकीचे निकाल आणि भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएला सभागृहात बहुमत मिळाल्यानंतर सरकार स्थापनेच्या मुद्यावर चर्चा झाली. जेडीयूचे प्रवक्ते केसी त्यागी यांनी सांगितले की, 7 जून रोजी सकाळी 11 वाजता संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये एनडीएच्या सर्व खासदारांची बैठक होणार आहे. 8 जूनला शपथविधी होण्याची शक्यता आहे.
किमान 4 कॅबिनेट मंत्रिपदे, बिहारला विशेष राज्याचा दर्जा
बहुमतापासून वंचित राहिल्याने सत्ताधारी एनडीएचा मजबूत सहयोगी म्हणून मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा दर्जा वाढला आहे. जेडीयूचे वरिष्ठ नेते राज्याच्या विकासाच्या अजेंड्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी जोरदार सौदेबाजी करण्याच्या मनस्थितीत असल्याचे बोलले जात आहे. सूत्रांच्या मते, त्यांच्या यादीत केंद्रीय मंत्रिमंडळातील अधिक मंत्रिपदे, केंद्रीय कोष, बिहारमध्ये लवकर विधानसभा निवडणुका आणि बिहारसाठी विशेष दर्जा अशा अटींचा समावेश आहे.