
कोझिकोड : केंद्रीयमंत्री मीनाक्षी लेखी यांनी ‘भारत माता की जय’ बोलण्यास नकार देणाऱ्या केरळच्या नागरिकांवर संताप व्यक्त केला आहे. त्या कोझिकोड येथील एका युवा संमेलनात संबोधित करत होत्या. या संमेलनात त्यांनी ‘भारत माता की जय’ची घोषणा देण्यास सांगितले असता गर्दीतील काही लोकांनी घोषणा देण्यास नकार दिला. यामुळे मीनाक्षी लेखी चांगल्याच संतापल्या.
‘भारत माता की जय’ बोलण्यास नकार देणाऱ्या जनतेला विचारले की, भारत तुमची आई नाही का? तसेच, त्यांनी घोषणाबाजी करण्यास नकार दिलेल्या एका महिलेला कार्यक्रमस्थळातून निघून जाण्याचीही सूचना केली. या संमेलनाचे आयोजन दक्षिणपंथी संघटनेने केले होते.
मीनाक्षी लेखी कोझिकोडमधील एका युवा संमेलनात संबोधित करत होत्या. संमेलनाच्या उत्तरार्धात त्यांनी भाषण आटोपताना ‘भारत माता की जय’ची घोषणा केली. परंतु, त्यांना उपस्थितांमधून प्रतिसाद कमी मिळाला. त्यामुळे त्यांनी थेट विचारले की, भारत तुमचे घर नाही का. भारत फक्त माझी आई का आहे? की तुमचीही आहे?
काही अडचण आहे का?. प्रतिसाद सुरुवातीला कमी मिळाल्यावर मिनाक्षी लेखी यांनी पुन्हा ‘भारत माता की जय’ ची घोषणा दिली. मात्र, तेव्हाही कमी प्रतिसाद मिळाला. तसेच, त्यांच्या डाव्या बाजूला बसलेल्या लोकांकडून कमी प्रतिसाद मिळत होता.
त्यावेळी एका महिलेला उद्देशून त्या म्हणाल्या, पिवळ्या रंगाची साडी परिधान केलेली महिलेने उभे राहावे. इथे-तिथे पाहू नका. मी तुमच्याशी बोलतेय. मी तुम्हाला थेट विचारते, भारत तुमची आई नाहीये का? हा ऍटिट्यूड का?, असा प्रश्न विचारल्यावरही त्या संबंधित महिनेले ‘भारत माता की जय’ची घोषणा देण्यास नकार दिला.