पुरुषांच्या अकाली मृत्यूचं कारण काय? शापामुळे नाही तर 'या' कारणामुळे मृत्यू...
भारतात विवाह ही एक सामाजिक व्यवस्था आहे. ज्यामध्ये दोन व्यक्ती आयुष्यभर एकत्र राहण्याचा आणि कुटुंब सुरू करण्याचा निर्णय घेतात.कायदे, नियम, रीतिरिवाज, समजुती आणि पद्धतींने एकमेकांना स्विकारतात. लग्न करण्यापूर्वी मुलाची आणि त्याच्या कुटुंबातील चौकशी केली जाते, जेणेकरून नवीन घरात मुलीला कोणत्याही अडचणी येऊ नयेत याची विशेष काळजी घेतली जाते. पण भारतात असं एक गाव आहे, बहुतांश महिलांनी त्यांचे पती गमावले आहेत. या सर्व महिलांचे जीवन संघर्षांनी भरलेलं आहे.या गावाला विधवांचे गाव म्हणून ओळखले जाते. या गावात लग्नानंतर पतीचा मृत्यू होतो म्हणून कोणतेही पालक लग्नासाठी या गावात मुली देताना विचार करतात. असं कोणतं गावं आहे जाणून घेऊया…
राजस्थानच्या बुंदी जिल्ह्यातील बुधपुरा गावाला ‘विधवांचे गाव’ म्हणूनही ओळखले जाते. या गावात राहणाऱ्या बहुतेक महिला विधवा आहेत. लग्नानंतर अनेकाचे पती लवकरच मृत्यू पावतात. त्यापैकी बहुतेकांवर त्यांच्या लहान मुलांना वाढवण्याची मोठी जबाबदारी असते. पण तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की त्यांच्या पतीचा मृत्यू कसा होत असेल?
अर्थातच, आता असं वाटत असेल की, हे गाव शापिते आहे किंवा येथील पुरुष काही रहस्यमय कारणामुळे मरतात. तर असं कोणतेही कारण नाही. येथील पुरुषांचा मृत्यू सिलिकोसिस नावाच्या आजाराने झाल्याचे अनेक अहवालांनी पुष्टी केली आहे. खरं तर, या गावातील बहुतेक पुरुष खाणींमध्ये काम करतात आणि त्यांना हा आजार होतो. वेळेवर आणि योग्य उपचारांअभावी त्यांचा मृत्यू होतो.
गावातील बहुतेक विधवा महिलांना कोणताही आधार मिळत नाही. परिणामी, त्यांना स्वतःचे आणि त्यांच्या कुटुंबाचे पोट भरण्यासाठी त्याच खाणींमध्ये काम करावे लागते. या खाणींमध्ये तासन्तास वाळूचे दगड फोडावे लागतात. कोरीवकाम करताना निर्माण होणारी धूळ फुफ्फुसांना संसर्ग होऊ शकते. उपचारांमुळे जीव वाचू शकतात, परंतु अन्यथा मृत्यू निश्चित आहे.
पतीच्या मृत्यूनंतरही येथील सर्व महिलांना मुलांचे संगोपन करण्यासाठी खाणीत काम करावं लागतं. बुधपुरा येथे वाळूचे खडे फोडण्याचे काम मोठ्या प्रमाणावर केलं जातं. या कामात बाहेर पडणाऱ्या सिलिका धुळीमुळे त्यांच्या फुफ्फुसात संसर्ग होतो. दुर्दैवाने, रुग्णांना वेळेवर योग्य उपचार मिळत नाहीत, त्यांना श्वास घेण्यास अधिक त्रास होतो आणि त्यांना जीवघेणे आजार होतात. या गावात अशा अनेक महिला आहेत, ज्यांनी खाणीत काम केल्यामुळे पती गमावले आहेत.






