बिहारच्या मतदार यादीत 18 लाख मृत, 26 लाख स्थलांतरित आणि 7 लाख दुहेरी नोंदणी असलेले मतदार
मुंबई : बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी मतदार यादी पुनरावृत्तीवरून बराच गोंधळ सुरू आहे. आता मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेडच्या खासदारांनी निवडणूक आयोगाच्या या प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. बांका येथील जेडीयूचे खासदार गिरधारी यादव यांनी बुधवारी आरोप केला की आयोगाने कोणतेही व्यावहारिक ज्ञान नसताना जबरदस्तीने मतदार सघन पुनरावृत्ती आमच्यावर लादली आहे. आपला अनुभव सांगताना त्यांनी मतदार यादी पुनरावृत्तीच्या वेळेच्या मर्यादेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि या प्रक्रियेसाठी किमान ६ महिने दिले पाहिजेत असे सांगितले.
तर दुसरीकडे भारत निवडणूक आयोगाच्यावतीने बिहारमध्ये सुरू असलेल्या विशेष संक्षिप्त पुनरावलोकनात (Special Intensive Revision – SIR) आतापर्यंत सुमारे 18.66 लाख मतदार मृत, 26.01 लाख अन्य मतदार स्थलांतरित झालेले असून, 7.5 लाख मतदारांची नोंदणी दोन ठिकाणी आढळली आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने जोरदार मोहीम हाती घेतली असून, येत्या 1 ऑगस्ट 2025 रोजी प्रारूप मतदार यादी प्रकाशित करण्यात येणार आहे. त्यासाठी सुमारे 1 लाख बीएलओ (BLO), 4 लाख स्वयंसेवक आणि 12 प्रमुख राजकीय पक्षांच्या जिल्हाध्यक्षांनी नियुक्त केलेले 1.5 लाख बीएलए (BLA) कार्यरत आहेत.
एकूण मतदार (२४ जून २०२५ रोजीपर्यंत): ७,८९,६९,८४४
प्राप्त गणनापत्रक (Enumeration Forms): ७,१६,०४,१०२ (९०.६७%)
डिजिटायझ्ड गणनापत्रक: ७,१३,६५,४६० (९०.३७%)
पत्त्यावर न सापडलेले मतदार: ५२,३०,१२६ (६.६२%)
मृत मतदार: १८,६६,८६९ (२.३६%)
कायमचे स्थलांतरित: २६,०१,०३१ (३.२९%)
दुहेरी नोंदणी: ७,५०,७४२ (०.९५%)
न सापडणारे: ११,४८४ (०.०१%)
एकूण कव्हर झालेले मतदार : ७,६८,३४,२२८ (९७.३०%)
अद्याप प्राप्त न झालेले गणनापत्रक: २१,३५,६१६ (२.७०%)
याबाबत 1 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर 2025 या कालावधीत सर्वसामान्य नागरिकांना प्रारूप मतदार यादीबाबत अधिकाऱ्यांकडे हरकती, दुरुस्ती, समावेश किंवा वगळण्याबाबत अर्ज करता येणार आहे, असे भारत निवडणूक आयोगाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
एसआयआरमधून कोणताही मतदार वगळला जाऊ नये यासाठी निवडणूक आयोगाने अनेक पावले उचलली आहेत. ज्या मतदारांची नावे मृत, हस्तांतरित किंवा दुहेरी नोंदणी म्हणून चिन्हांकित केली गेली आहेत त्यांची यादी राजकीय पक्ष आणि त्यांच्या बूथ लेव्हल एजंट्सना शेअर करण्यात आली आहे. २५ जुलैपर्यंत या मतदारांची स्थिती निश्चित करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.
याशिवाय, १ ऑगस्ट रोजी प्राथमिक मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर, १ सप्टेंबरपर्यंत दावे आणि हरकती दाखल करण्यासाठी वेळ देण्यात येईल. त्यानंतर, ३० सप्टेंबर २०२५ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल.