
मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये काँग्रेस पक्षाच्या पराभवावर विरोधक टोमणे मारत आहेत. पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू दानिश कनेरियानेही खरपूस समाचार घेतला आहे. कोणाचेही नाव न घेता त्याने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर विचारले आहे – पनवती कोण आहे? विधानसभा निवडणुकीदरम्यान क्रिकेट विश्वचषकाचा अंतिम सामना खेळला गेला होता. या सामन्यात भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. राहुल गांधी यांनी यासाठी पंतप्रधान मोदींच्या स्टेडियममधील उपस्थितीला जबाबदार धरले होते.
वर्ल्ड कप झाल्यानंतर पनवती हा शब्द अचानक ट्रेंडमध्ये आला होता. त्यानंतर निवडणूक प्रचाराच्या एका रॅलीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पनवती शब्द उच्चारून अप्रत्यक्षपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती. आता चार राज्याचे निकाल लागल्यानंतर पुन्हा एकदा पनवती हा शब्द चर्चेत आला आहे. पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू दानिश कनेरिया यांनी पनवती कोण? असा सवाल केला आहे. दानिश कनेरियाने ट्विट करून हा सवाल केला आहे.
आज भाजप समर्थकांनी सोशल मीडियावर काँग्रेसच्या पराभवावर टीका केली आहे. ते सोशल मीडियावर विचारत आहेत, आता सांगा पनवती कोण?
काय आहे कल?
चार राज्याच्या विधानसभा निवडणुकांचा कल समोर आला आहे. या कलानुसार राजस्थानमध्ये काँग्रेसला 70 तर भाजपला 113 जागा मिळताना दिसत आहेत. मध्यप्रदेशात भाजपला 161 आणि काँग्रेसला 66 जागा मिळताना दिसत आहे. छत्तीसगडमध्ये भाजपला 55 आणि काँग्रेसला 32 जागा मिळताना दिसत आहेत. तसेच तेलंगणात काँग्रेसला 63 आणि भाजपला 8 जागा मिळताना दिसत आहेत.