
'क्षयरोगमुक्त भारत' साठी १०० दिवसांचा उपक्रम सुरू! कमकुवत रोगप्रतिकारकशक्ती असल्यास वाढू शकतो क्षयरोगचा धोका
मुंबई येथील ‘राजा रामदेव आनंदीलाल पोदार केंद्रीय आयुर्वेद संशोधन संस्थे’मध्ये, संस्थेचे प्रभारी अधिकारी डॉ. विपिन कुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली, ‘क्षयरोगमुक्त भारत अभियान’ हा १०० दिवसांचा उपक्रम यशस्वीरित्या सुरू करण्यात आला. हा उपक्रम भारताला क्षयरोगापासून मुक्त करण्याच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. याप्रसंगी, २५ एप्रिल २०२६ रोजी, सर्व अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, परिचारिका वर्ग आणि कर्मचारी यांनी ‘निक्षय प्रतिज्ञा’ घेऊन क्षयरोग निर्मूलनाप्रती आपली कटिबद्धता व्यक्त केली. या प्रतिज्ञेच्या माध्यमातून सामूहिक जबाबदारी, जागृती आणि सक्रिय सहभाग यांचा संदेश देण्यात आला.(फोटो सौजन्य – istock)
आपल्या भाषणात, डॉ. विपिन कुमार शर्मा यांनी क्षयरोगाचा प्रसार, प्रतिबंध आणि जोखीम घटक यांविषयी सविस्तर माहिती दिली. त्यांनी स्पष्ट केले की, जेव्हा एखादी बाधित व्यक्ती खोकते किंवा शिंकते. तेव्हा प्रामुख्याने हवेद्वारे क्षयरोगाचा प्रसार होतो.क्षयरोगाचा प्रतिबंध करण्यासाठी त्यांनी लवकर निदान, नियमित उपचार, संतुलित आहार आणि स्वच्छता याना मुख्य उपाय म्हणून अधोरेखित केले. शिवाय, मधुमेह, कुपोषण किंवा कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या व्यक्तींना क्षयरोग होण्याची शक्यता अधिक असते, असेही त्यांनी नमूद केले.
१०० दिवसांच्या या अभियानांतर्गत प्रस्तावित उपक्रमांची रूपरेषा मांडताना, डॉ. शर्मा यांनी सांगितले की, हा कार्यक्रम आयुष मंत्रालय आणि आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वाच्या अनुषंगाने राबवला जात आहे.या उपक्रमांचा मुख्य उद्देश म्हणजे क्षयरोगाविरुद्धच्या लढचात लवकर निदान, प्रभावी उपचार आणि जनसहभागाला चालना देणे हा आहे.
‘आयुष्मान आरोग्य शिबिरांचे’ (तपासणी शिबिरांचे) आयोजन, क्षयरोगाशी संबंधित जागृती आणि माहिती, शिक्षण व संवाद उपक्रम, ‘निक्षय मित्रांची’ (क्षयरोग सहाय्यक स्वयंसेवक) नोंदणी आणि सक्रिय सहभाग, क्षयरोगाच्या उपचारामध्ये आयुष आधारित आरोग्य पद्धतींचा समावेश करणे,इत्यादी बाबींचा समावेश आहे.
Travel News : ताऱ्यांच जग पाहण्याची संधी, महाराष्ट्रात खुले झालेत नवे टुरिस्ट स्पॉट
या प्रसंगी संस्थेच्या भूमिकेवर प्रकाश टाकताना असे नमूद करण्यात आले की, मुंबई येथील ‘राजा रामदेव आनंदीलाल पोदार केंद्रीय आयुर्वेद संशोधन संस्था’ ही जागृती कार्यक्रम, समुदाय संपर्क मोहीम, तपासणी उपक्रम आणि आयुष पद्धतींचा समावेश यांद्वारे या अभियानाला भक्कम पाठिंबा देईल. क्षयरोग निर्मूलनाच्या दिशेने सुरू असलेल्या प्रयत्नांना गती देण्याच्या उद्देशाने, ही १००-दिवसीय मोहीम २४ एप्रिल २०२६ ते ३० जून २०२६ या कालावधीत राबविली जात आहे. क्षयरोग हरेल, राष्ट्र जिंकेल’ या संदेशासह या कार्यक्रमाची सांगता झाली यावेळी सर्वांना एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन करण्यात आले.