कुपोषणापासून मुलांना कसे वाचवाल (फोटो सौजन्य - iStock)
कुपोषण ही एक अत्यंत भीषण समस्या आहे, जी लक्षावधी मुलांना त्यांच्या आरोग्यापासून, स्वप्नांपासून आणि एक अधिक चांगले भविष्य घडविण्यापासून वंचित ठेवते. ही समस्या उष्मांक, प्रथिनं, जीवनसत्वे आणि खनिजे यांच्या आहारातील अपुऱ्या मात्रेमधून व त्यांना प्रभावीपणे शोषून घेण्याच्या शरीराच्या अक्षमतेमधून उद्भवते.
ही समस्या सर्व वयोगटातील लोकांवर परिणाम करत असली तरीही लहान मुलांवरील तिचा परिणाम हा मोठा असतो, ज्यामुळे त्यांच्या शारीरिक वाढीत अडथळा निर्माण होतो, रोगप्रतिकारक यंत्रणा कमकुवत होतात व ही मुले अधिक सहजपणे आजारी पडतात. कुपोषणाच्या तीव्र परिणामांपैकी आणखी एक परिणाम म्हणजे वाढ खुंटणे (स्टंटिंग) – एक अशी स्थिती ज्यात वाढीची व विकासाची प्रक्रिया कमकुवत होते व त्याचा मुलांच्या आरोग्यावर व भविष्यावर दीर्घकालीन परिणाम होतो.
मुलांची वाढ न होणे
लहान मुलांची वाढ खुंटणे ही एक जागतिक, विशेषत: भारतातील एक लक्षणीय आरोग्य समस्या आहे, जी लक्षावधी लोकांना प्रभावित करते. नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे (NFHS -5)च्या आकडेवारीनुसार सुमारे पाच वर्षांखालील सुमारे ३५ टक्के मुलांची वाढ खुंटलेली आहे, यातून या मुलांमध्ये असलेली कुपोषणाची गंभीर समस्या दिसून येते व त्याची परिणती दीर्घकालीन शारीरिक व संज्ञानात्मक विकलतेमध्ये होऊ शकते.
काय सांगतात तज्ज्ञ
बॉम्बे हॉस्पिटल, मुंबई, भारत येथील सीनिअर कन्सल्टन्ट डॉ. मुकेश सांकलेचा यातील महत्त्वाचे मुद्दे अधोरेखित करताना सांगतात, “स्टंटिंगमुळे मुलांच्या केवळ शारीरिक वाढीवर व वजनावरच परिणाम होत नाही तर त्यांचा संज्ञानात्मक विकास, रोगप्रतिकारशक्ती आणि एकूणच स्वास्थ्य कमकुवत होते, ज्याचे परिणाम आयुष्यभर सहन करावे लागतात. याचा सामना करण्यासाठी मुलांच्या वाढीची व विकासाची नियमित तपासणी करणे व त्यावर देखरेख ठेवणे अत्यावश्यक आहे.
या पद्धतीमुळे कुपोषण व विकासप्रक्रियेतील विलंब यांचे लवकरात लवकर निदान होऊ शकते व या स्थितीला कारणीभूत ठरणारी मूळ कारणे दूर करण्यासाठी वेळच्यावेळी हस्तक्षेप केला जाऊ शकतो. इतकेच नव्हे तर पोषणातील त्रुटी ओळखण्यासाठी केल्या जाणाऱ्या तपासण्यांना महत्त्व देणे हे आपल्या मुलांच्या अधिक आरोग्यपूर्ण भविष्याची जडणघडण करण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. फळे, भाज्या, अखंड धान्ये आणि प्रथिने यांच्यासारख्या पोषक घटकांनी समृद्ध पदार्थांचा आहारात समावेश केल्याने पोषणामध्ये कमतरता राहून जाण्याची समस्या दूर होण्यास मदत होऊ शकते व मुलांच्या एकूण वाढीलाही आधार मिळू शकतो.”
चिन्हे कशी ओळखावी
मुलांची वाढ होण्यासाठी व त्यांना आपली संपूर्ण क्षमता गाठता यावी यासाठी त्यांना योग्य पोषण मिळणे अत्यंत महत्त्वाचे आहे, तरीही जगभरात वाढ खुंटलेल्या पाच वर्षांखालील मुलांची संख्या सुमारे १४.९ कोटी इतकी आहे व त्यातील एक तृतीयांश किंवा ४.६ कोटी मुले भारतात आहे. म्हणूनच आपल्या मुलांची वाढ व विकास यांवर देखरेख ठेवण्यामध्ये पालक आणि काळजीवाहू व्यक्ती महत्वाची भूमिका बजावू शकतात. तपासणी महत्त्वाची का आहे व वाढ खुंटण्याची अर्थात स्टंटिंगची चिन्हे कशी ओळखायची याचा खोलात जाऊन वेध घेऊया
स्टंटिंगची चिन्हे ओळखणे
बरेचदा सुरुवातीच्या टप्प्यावर समस्या दुर्लक्षित राहून जाते, मात्र ही स्थिती गंभीर रूप धारण करण्यापूर्वी हस्तक्षेप करण्यासाठी काळजीवाहू व्यक्ती आणि आऱोग्यसेवाकर्मी काही मुख्य लक्षणे तपासू शकतात. यात पुढील लक्षणांचा समावेश होतो:
उंची आणि वय यांचे गुणोत्तर: जी मुले आपल्या समवयीन मुलांपेक्षा लक्षणीयरित्या कमी उंचीची असतात त्यांची वाढ खुंटलेली असू शकते. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) केलेल्या व्याख्येनुसार स्टंटिंग म्हणजे उंचीसाठी प्रमाण वयाचे Z-गुणांकन सरासरीपेक्षा दोन पातळ्यांहून खाली असणे. एखाद्या मुलाची उंची सातत्याने त्याच्या/तिच्या वयासाठी अपेक्षित प्रमाण वयापेक्षा कमी राहणे.
अपुरे वजन: कालपरत्वे, वय वाढत असूनही अपुरी राहिलेली किंवा खुंटलेली वजनवाढ हे स्टंटिंगचे सुरुवातीचे लक्षण असू शकते.
शारीरिक स्वरूप: बाहूचा वरचा भाग किंवा मांड्या यांच्याभोवतीची त्वचा सैल पडलेली असणे, बरगड्या दिसणे किंवा मसल मास नसल्याचे स्पष्ट दिसणे ही स्टंटिगची लक्षणे असू शकतात.
विकासाचे टप्पे गाठण्यास विलंब: वाढ खुंटलेल्या मुलांना चालणे किंवा बोलणे असे विकासाचे महत्त्वाचे टप्पे गाठण्यास वेळ लागत असल्याचे दिसून येते. चालणे किंवा बोलणे यांसारखे विकासात्मक टप्पे गाठण्यास विलंब.
वारंवार आजारी पडणे: कमकुवत झालेल्या रोगप्रतिकार यंत्रणेमुळे वारंवार जंतूसंसर्ग होणे किंवा आजारी पडणे हेही स्टंटिंगचे एक लक्षण असू शकते.
स्टंटिंग हे एक गंभीर आव्हान आहे, मात्र सातत्यपूर्ण तपासण्या, जागरुकता आणि पोषक घटकांची जोड यांच्या साथीने पालक व काळजीवाहू व्यक्ती मुलांच्या वाढीला व क्षमतेला असलेल्या या मूक संकटाचा सामना करू शकतात.
बघता बघता होईल शरीराचा सांगाडा, जेवणाच्या ताटात जर नसतील 15 पोषक तत्व
नियमित आरोग्य तपासणी महत्त्वाची का आहे?
आरोग्य व्यवस्थापनाला आपणहून सक्रियतेने प्राधान्य देणे हे एका अधिक निरोगी आणि समस्यांचा अधिक चांगला सामना करू शकणाऱ्या लोकसंख्येची जोपासना करण्याच्या दृष्टीने अत्यावश्यक आहे. नियमित तपासण्या पुढील प्रकारे मदत करतात.
लवकर निदान होणे: स्टंटिंगच्या समस्येचे निदान लवकर झाल्यास मुलांच्या पोषणाची स्थिती व त्यांचे एकूण स्वास्थ्य यांच्यामध्ये लक्षणीय सुधारणा घडवून आणू शकतील, अशा उपाययोजना करता येतात.
संपूर्ण माहितीनिशी निर्णय घेणारे पालकत्व: स्क्रिनिंग किंवा तपासण्यांमुळे पालकांना आपल्या पाल्याच्या वाढीतील समान वा सातत्याने दिसणाऱ्या गोष्टींची माहिती मिळते, ज्यामुळे त्यांना पोषण व आरोग्याविषयीचे निर्णय संपूर्ण माहितीनिशी घेता येतात.
संसाधनांची उपलब्धता: समस्या लवकर ओळखल्यामुळे बरेचदा कुपोषणाशी लढा देण्याच्या दृष्टीने तयार केलेल्या पोषण कार्यक्रमांपर्यंत व संसाधनांपर्यंत पोहोचणे शक्य होते.
लहानग्यांसाठी काही धोरणे
योग्य पोषणामुळे मुलांच्या इष्टतम वाढीसाठी व विकासासाठी गरजेची असलेले अत्यावश्यक पोषक घटक मुलांना खात्रीपूर्वक मिळतात आणि म्हणूनच ते स्टंटिंग रोखण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावते. प्रथिनं, जीवनसत्वे, खनिजे आणि आरोग्याला पोषक स्निग्ध पदार्थ यांनी समृद्ध आहार शारीरिक वाढीला पाठबळ देतो, रोगप्रतिकार यंत्रणा बळकट बनवितो आणि संज्ञानात्मक विकासाला मदत करतो.
सुरुवातीच्या टप्प्यावर, विशेषत: आयुष्याच्या पहिल्या १,००० दिवसांमध्ये झालेल्या पोषणरूपी हस्तक्षेपामुळे स्टंटिंगचा धोका लक्षणीयरित्या कमी होऊ शकतो व आरोग्यपूर्ण भविष्याचा भक्कम पाया घातला जाऊ शकतो. जेवणाच्या बाबतीत कटकट करणाऱ्या मुलांना सकस आहार घेण्यास प्रोत्साहित करणे आव्हानात्मक जरूर आहे. मात्र ते स्टंटिंग रोखण्याच्या व वाढीला आधार देण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यांना आवश्यक ते पोषक घटक मिळत आहेत याची खातरजमा करण्यासाठी पुढील उपाय करून पाहता येतील.
काय आहेत उपाय
लवकर निदान होण्यासाठी व पालकांना स्टंटिंगच्या विरोधात सक्षम बनविण्यासाठी स्क्रिनिंग ही गुरुकिल्ली आहे. संतुलित आहारामुळे पोषक घटक शरीरात शोषले जाण्यास आणि वाढीस बळ मिळते, जे खाण्यासाठी कटकट करणाऱ्या मुलांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. नियमित तपासण्या आणि योग्य आहारामुळे मुलांच्या आरोग्यास आधार मिळतो, त्यामुळे त्यांच्या निकडीच्या गरजा पूर्ण होतात, ज्यामुळे भारतभरामध्ये अधिक निरोगी भविष्यांची उभारणी होऊ शकते.