
सतत आंबट ढेकर येतात? जेवताना केलेली एक चूक शरीरासाठी ठरेल धोक्याची, अपचनाच्या समस्येवर करा 'हे' उपाय
ढेकर येण्याची कारणे?
अपचनावर घरगुती उपाय?
पोटात हवा कशामुळे जमा होते?
पोटभर जेवल्यानंतर सगळ्यांचं ढेकर येतात. ढेकर येणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. पण बऱ्याचदा अपचन किंवा ऍसिडिटी झाल्यानंतर सतत आंबट ढेकर येतात. पण वारंवार आंबट ढेकर येत असतील तर पचनाच्या समस्या, ॲसिडिटी किंवा चुकीच्या खाण्याच्या सवयींमुळे शरीराचे नुकसान होते. दैनंदिन आहारात तिखट, तेलकट आणि अतिमसालेदार पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीराच्या पचनक्रियेवर परिणाम होण्याची शक्यता असते. धावपळीची जीवनशैली, कामाचा वाढलेला तणाव, कमी पाण्याचे सेवन, अपुरी झोप, चुकीच्या वेळी जेवण इत्यादी गोष्टींच्या परिणामामुळे खाल्लेले अन्नपदार्थ व्यवस्थित पचन होत नाही. सतत येणाऱ्या आंबट ढेकरांमुळे घशाजवळ जळजळ वाढणे, अन्ननलिकेमध्ये अन्नाचे बारीक कण जमा होणे इत्यादी समस्या उद्भवू लागतात. याशिवाय हवा गिळणे, गॅस तयार होणे किंवा ॲसिड रिफ्लक्स इत्यादी समस्यांकडे वेळीच लक्ष न दिल्यास पोटासंबंधित गंभीर आजारांची लागण होऊ शकते. चला तर जाणून घेऊया अपचनाच्या समस्येवर कोणते उपाय करावेत.(फोटो सौजन्य – istock)
सतत ढेकर येण्यामागील महत्वपूर्ण कारण म्हणजे अन्नपदार्थांचे सेवन करताना हवा गिळणे. अन्नाचे पचन होताना पोटात वायू तयार होती, जो वरच्या दिशेने अन्ननलिकेतून बाहेर पडून जातो. पण जर ढेकर येण्यासोबतच छातीत जळजळ, तोंडात आंबट पाणी तयार होत असेल तर ते गॅस्ट्रोएसोफेजल रिफ्लक्स आजाराचे लक्षण असू शकते. पचनसंस्थेतील लोअर इसोफेजियल स्फिंक्टर हे सैल झाल्यामुळे पोटातील हवा आणि ॲसिड वारंवार वर येऊन सतत आंबट ढेकर येतात.
जेवणताना अनेकांना कळत नकळत हवा गिळण्याची सवय असते. मात्र ही चुकीची सवय शरीरासाठी अतिशय घातक ठरू शकते. कामाच्या धावपळीमध्ये बऱ्याचदा अनेकांना वेगाने जेवण्याची सवय असते. वेगाने जेवताना बाहेरील हवा पोटात जाते. तोंडात हवा तशीच राहते. अशावेळी अपचन किंवा गॅस होतो. ऍसिडिटीची समस्या उद्भवल्यानंतर आणि पोटात जमा झालेला वायू बाहेर काढून टाकण्यासाठी सोडा किंवा कोल्ड्रिंक प्यायले जाते. यामध्ये असलेले कार्बन डायऑक्साइड पोटात जमा झालेला वायू ढेकर स्वरूपात बाहेर काढून टाकतो. खाल्लेले अन्नपदार्थ व्यवस्थित पचन न झाल्यामुळे पोटात फर्मेन्टेशन होण्यास सुरुवात होते. अन्नपदार्थांचे कण कुजल्यानंतर आतड्यांमध्ये विषारी घटक तसेच साचून राहतात.
पोटात कुजलेल्या घाणीमुळे कार्बन डायऑक्साइड आणि हायड्रोजन तयार होण्यास सुरुवात होते. पोटात जमा झालेला वायू खालच्या दिशेने बाहेर पडून न गेल्यास ढेकर स्वरूपात बाहेर पडून जातो. यामुळे बऱ्याचदा पोटात जडपणा जाणवणे, पोटात वेदना वाढणे इत्यादी समस्या उद्भवण्याची जास्त शक्यता असते. ऍसिडिटी वाढल्यानंतर शरीरात अस्वस्थपणा जाणवू लागतो. आंबट ढेकर, उलट्या, मळमळ, डोकेदुखीचा त्रास वाढून संपूर्ण आरोग्य बिघडून जाते. पोटात जास्त वेळ हवा टिकून राहिल्यास घशा जवळ किंवा छातीमध्ये जळजळ वाढते. पोटात वाढलेल्या विषाणूमुळे अल्सर सुद्धा होऊ शकतो.
अन्नपदार्थ खाताना अन्नाचा एक एक घास व्यवस्थित चावून खाल्ल्यास पोटात हवा जात नाही. तर आतड्यांमध्ये जमा झालेली विषारी घाण बाहेर काढून टाकण्यासाठी आल्याचा रस किंवा उपाशी पोटी कोमट पाणी प्यावे. यामुळे संपूर्ण शरीर डिटॉक्स होण्यास मदत होते. कोबी, ब्रोकोली, कडधान्ये किंवा जास्त फायबर असलेल्या पदार्थांचे सेवन केल्यामुळे अपचन होत नाही. तसेच जेवण आणि झोप यात ३ तासांचे अंतर असावे.