
अंगाला सतत खाज किंवा पुरळ येते? पावसाळ्यात त्वचेच्या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी पाण्यात टाका 'हे' पदार्थ
राज्यासह संपूर्ण देशभरात सगळीकडे मुसळधार पाऊस पडत आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे सगळीकडेच पाणी साचून राहते. साचून राहिलेल्या पाण्यात मोठ्या प्रमाणावर हानिकारक जिवाणू आणि बॅक्टरीया वाढतात. पावसात भिजून आल्यानंतर काहींना ओले कपडे घालून तसेच राहण्याची सवय असते. या चुकीच्या सवयींमुळे आजारपण वाढते आणि रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होऊन जाते. पावसाच्या पाण्यात भिजून आल्यामुळे किंवा साचून राहिलेल्या पाण्यात पाय भिजल्यामुळे खाज येणे, जखमा होणे, पुरळ येणे तर काहीवेळा त्वचेसंबंधित गंभीर समस्या वाढतात. बुरशीजन्य संसर्ग झाल्यानंतर त्वचेमध्ये खूप जास्त जळजळ होते. पण सुरुवातीच्या दिवसांमध्ये अतिशय सामान्य समजून दुर्लक्ष केले जाते. यामुळे त्वचेवर संसर्ग आणखीनच वाढतो.(फोटो सौजन्य – istock)
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये त्वचेची काळजी घेणे फार आवश्यक आहे. अन्यथा शरीरावर जखमा किंवा पुरळ येऊन सतत खाज येऊ शकते. खाज किंवा वाढत्या पुरळपासून सुटका मिळवण्यासाठी घरगुती उपाय करावेत. यामुळे त्वचा आतून स्वच्छ होते आणि त्वचेच्या समस्या कमी होण्यास मदत होते. त्वचेवरील ताजेपणा टिकून ठेवण्यासाठी नॅचरल पदार्थांचा वापर करावा. मात्र त्वचेवर खूप जास्त जखमा किंवा डाग, पिंपल्स वाढू लागल्यास तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करणे फार आवश्यक आहे. अन्यथा त्वचा खराब होऊ शकते.
अंघोळीच्या पाण्यात कडुलिंबाची पाने घालून पाणी गरम करून घ्यावे. यामुळे जीवाणू, बुरशी आणि काही सूक्ष्मजंतूंविरुद्ध कार्य करणारे गुणकारी घटक असतात. पावसाळ्यात येणारी खाज, किरकोळ जळजळ आणि ओलाव्यामुळे निर्माण होणारा त्रास कमी करण्यासाठी कडुलिंबाच्या पानांचा वापर करावा. मागील बऱ्याच वर्षांपासून कडुलिंबाच्या पानांचा वापर त्वचेसाठी केला जातो. कडुलिंबाच्या पानांचा काढा किंवा अंघोळ केल्यास शरीरावर आलेली खाज कमी होण्यास मदत होते.
अंघोळीच्या गरम पाण्यात नेहमीच मीठ टाकावे. मिठाच्या पाण्याने अंघोळ केल्यास शरीरातील नकारात्मक ऊर्जा दूर होण्यासोबतच घाम, धूळ आणि त्वचेवरील किरकोळ अस्वस्थता कमी करण्यासाठी जाड मीठ अंघोळीच्या पाण्यात टाकावे. पाऊस पडून गेल्यानंतर पायांना जखमा होतात. या जखमा कमी करण्यासाठी गरम पाण्यात मीठ टाकून पाय सोडून बसावे. मात्र अतिप्रमाणात मिठाचा वापर केल्यास त्वचेमध्ये जळजळ होऊ शकते.
अंघोळीच्या पाण्यात तुळशीची पाने टाकावीत. यामुळे दुर्गंधी आणि सतत येणाऱ्या घामापासून सुटका मिळते. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये त्वचेसंबंधित निर्माण झालेल्या सामान्य समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी घरगुती उपाय करावेत. यामुळे त्वचेला कोणतीही हानी पोहचणार नाही. वारंवार पुरळ किंवा लाल रॅश येत असतील तर वेळीच डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावेत.