
फोटो सौजन्य - Social Media
मुंबई म्हणजे रोषणाई! असं जर तुम्ही मनात मानत असाल तर काही अंशी आजही तुम्ही चुकीचे आहात आणि नेहमी असाल. कारण या जगात फक्त मानवी शक्ती राहत नाही. मानवाच्या बरोबर एक अशीही शक्ती येथे वास्तव्य करते जी अदृश्य आहे, पण कालयोगाने मानवी डोळ्यांनाही दिसून येतात आता मुंबई जर या सृष्टीचाच भाग आहे तर येथे ही त्या अदृश्य शक्ती नक्कीच असतील, त्या कुठे जात नाहीत, त्या आपल्यामध्येच असतात. अशी काही घटना मुंबईच्या वरळी भागातील ‘चेंबर्स बिल्डिंग’ येथे घडली आहे.
मुंबईतील Chambers Building येथे घडलेली ही घटना अंगावर काटा आणणारी आहे. चिराग हा एक साधा मध्यमवर्गीय मुलगा, वॉटर प्युरिफायर कंपनीत सेल्समन म्हणून काम करत असतो; पण तीन महिने झाले तरी त्याच्याकडून एकही सेल झालेला नसतो. घरची जबाबदारी, आजारी आई आणि बॉसचा तगादा यामुळे तो मानसिक तणावाखाली असतो. मात्र त्या दिवशी नशिबाने त्याची साथ दिली आणि त्याने सलग पाच प्रॉडक्ट विकले. संध्याकाळी त्याला वरळीतील चेंबर्स बिल्डिंगमधील एका मोठ्या कंपनीची लीड मिळाली. चिराग तिथे पोहोचल्यावर त्याला आजूबाजूला विचित्र शांतता जाणवते. गेटवरील वॉचमन त्याच्याकडे पाहून गूढ हसतो, पण चिराग दुर्लक्ष करून आत जातो. लिफ्ट बंद असल्यामुळे तो पायऱ्यांनी पाचव्या मजल्यावर जातो, जिथे त्याला एक व्यवस्थित ऑफिस दिसते.
आत रिसेप्शनवर बसलेली महिला त्याला थांबायला सांगते. वेळ जात राहतो ४ ते ६ वाजेपर्यंत पण ऑफिसमध्ये कोणीच दिसत नाही, फक्त ती महिला आणि एक बंद केबिन. संध्याकाळ होताच ती अचानक मोठ्या ऑर्डरबद्दल सांगते आणि चिराग थांबण्याचा निर्णय घेतो. रात्री ८ वाजता अचानक भीषण आवाज होतो, जणू काही बॉम्बस्फोट झाला आहे; इमारत हादरते, अलार्म वाजतात आणि लोकांच्या किंचाळण्याचे आवाज ऐकू येतात. घाबरलेल्या चिरागला ती रिसेप्शनिस्ट मात्र शांतपणे सांगते की हे रोजचं आहे. त्यानंतर तिचा चेहरा बदलू लागतो, त्वचा वितळते आणि ती भयानक रूप धारण करते.
चिराग घाबरून देवाचा जप करू लागतो. तेवढ्यात वॉचमन येतो आणि त्याला खाली घेऊन जातो. तो सांगतो की वरच्या मजल्यांवर १९९३ आणि १९९७ मधील दुर्घटनांमध्ये मृत्यू पावलेले आत्मे भटकतात. दुसऱ्या दिवशी चिराग जेव्हा ऑफिसमध्ये सर्व सांगतो, तेव्हा त्याचा बॉस सांगतो की ती बिल्डिंग अनेक वर्षांपासून बंद आहे आणि तिथे कोणीही जात नाही, अगदी वॉचमनही नाही. हे ऐकून चिरागला समजते की काल त्याने ज्यांच्याशी संवाद साधला, ते सगळे जिवंत नव्हते, ते फक्त भूतं होती.
(टीपः आम्ही देत असणारे हे आर्टिकल काही व्यक्तींसह घडलेले अनुभव आहेत. मात्र आम्ही कोणतीही अंधश्रद्धा पसरवत नाही तर हे आर्टिकल केवळ माहिती आणि मनोरंजनाकरिता असून Navarashtra.com यासाठी कोणतीही पुष्टी देत नाही)