हिमालय पर्वतराजाची कन्या पार्वती ही उपवर झाली आणि नारदाच्या सांगण्यावरून तिच्या पित्याने तिचा विवाह विष्णूशी करण्याचा बेत केला. मात्र, पार्वतीच्या मनात शंकर भगवान असल्याने तिने आपल्या सखीकडून पित्यास निरोप पाठविला की, तुम्ही मला विष्णूच्या पदरी बांधल्यास मी प्राणत्याग करीन. इतक्यावरच ती थांबली नाही, तर आपल्या सखीच्या मदतीने घरातून पळून गेली व तिने शिवप्राप्तीसाठी अरण्यात जाऊन तपस्या केली.
सलग १२ वर्षे केवळ रूईची पाने चाटून पार्वतीने तपाचरण केले. भाद्रपद महिन्यातील तृतीयेला हस्त नक्षत्रावर पार्वतीने शिवलिंगाची पूजा केली. दिवसभर कडकडीत उपवास केला. जागरण केले. तिच्या तपाने महादेव प्रसन्न झाले. पार्वतीच्या विनंतीला मान देऊन महादेवांनी पत्नी म्हणून तिचा स्वीकार केला, अशी आख्यायिका आहे.