फोटो सौजन्य - Social Media
मृग नक्षत्रात समाधानकारक पाऊस न झाल्याने खरीप हंगाम लांबणीवर जाण्याची चिंता अनसिंग परिसरातील शेतकऱ्यांना सतावत होती. मात्र, आर्द्रा नक्षत्राच्या सुरुवातीलाच झालेल्या दमदार पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, परिसरातील खरीप पेरण्या आता अंतिम टप्प्यात पोहोचल्या आहेत.
मृग नक्षत्र कोरडे गेल्याने शेतातील जमीन कोरडी पडली होती. त्यामुळे सोयाबीन, कापूस आणि तूर यांसारख्या खरीप पिकांच्या पेरण्या रखडल्या होत्या. मात्र, आर्द्रा नक्षत्राच्या प्रारंभी मेघगर्जनेसह झालेल्या जोरदार पावसामुळे शिवारातील धुळीचे साम्राज्य संपुष्टात आले आणि जमिनीत पेरणीसाठी आवश्यक ओलावा निर्माण झाला. यामुळे चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा शेताचा रुख केला.
गेल्या काही दिवसांपासून पावसाचा वेगळाच पॅटर्न पाहायला मिळत आहे. दिवसभर पाऊस उघडीप देत असला, तरी सायंकाळच्या सुमारास दमदार सरी कोसळत आहेत. या वातावरणाचा फायदा घेत शेतकरी पेरणीच्या कामात व्यस्त झाले आहेत. कुठे बैलजोडीच्या साहाय्याने, तर कुठे ट्रॅक्टर आणि आधुनिक टोकण यंत्राच्या मदतीने सोयाबीन, कापूस आणि तुरीची पेरणी वेगाने सुरू आहे.
सध्या अनसिंग आणि परिसरातील बहुतांश शेतांमध्ये पेरणी पूर्ण झाली असून, उर्वरित कामही अंतिम टप्प्यात आहे. येत्या एक-दोन दिवसांत जवळपास १०० टक्के पेरण्या पूर्ण होतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. वेळेत झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा समाधान दिसून येत आहे.
दरम्यान, हवामान विभागाने पुढील काही दिवस हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे नव्याने पेरणी केलेल्या पिकांना आवश्यक ओलावा मिळण्याची शक्यता असून, यंदाचा खरीप हंगाम चांगला होईल, अशी आशा शेतकरी व्यक्त करत आहेत. मृग नक्षत्राने निराशा दिली असली, तरी आर्द्रा नक्षत्राच्या पावसाने बळीराजामध्ये नव्या आशा निर्माण केल्या आहेत. आता वेळेवर पाऊस कायम राहिल्यास यंदा चांगल्या उत्पादनाची अपेक्षा शेतकरी बांधवांकडून व्यक्त केली जात आहे.






