
मध्य रेल्वेच्या जागेवर १६ हजार बेकायदेशीर झोपड्या! कुर्ला-ट्रॉम्बे, कल्याण, डोंबिवलीत सर्वाधिक विळखा
वांद्रे पूर्वेतील गरीब नगरमध्ये हजारो झोपड्यांवर बुलडोझर चालवल्यानंतर आता मध्य रेल्वेच्या जागांवरील अतिक्रमणांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. रेल्वेच्या लाखो चौरस मीटर जमिनीवर हजारो अनधिकृत बांधकामे उभी राहिली असून, एवढ्या मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे असतानाही कारवाईबाबत रेल्वे प्रशासनाची भूमिका धूसरच असल्याने संताप व्यक्त होत आहे. यामुळे भविष्यातील विकासकामे रखडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मध्य रेल्वेच्या विविध विभागांमध्ये तब्बल १६ हजार ३० पेक्षा अधिक झोपड्या आणि अनधिकृत बांधकामांनी ५ लाख चौरस मीटरपेक्षा अधिक रेल्वे जमीन गिळंकृत केली आहे. रेल्वेच्या नोंदीनुसार कुर्ला-ट्रोम्बे, कल्याण आणि डोंबिवली परिसरात अतिक्रमणांचा सर्वाधिक विळखा आहे.(फोटो सौजन्य – AI)
अनेक ठिकाणी रेल्वेच्या आरक्षित जागांवर थेट झोपड्या, गाळे, दुकाने आणि अनधिकृत व्यावसायिक बांधकामे उभी राहिली आहेत. काही भागांत तर रेल्वे रुळालगतच झोपड्यांची साखळी निर्माण झाली असून त्यामुळे सुरक्षेचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे.कुर्ला-ट्रोम्बे परिसरात सर्वाधिक ५,५९५ झोपड्या असून ५०,३५ चौरस मीटर जागा अतिक्रमणाखाली गेली आहे. कल्याणमध्ये ३,१६० झोपड्यांनी तब्बल २,३५,९० चौरस मीटर जमीन व्यापली आहे. डोंबिवलीत २,९०२ झोपड्यांमुळे जवळपास १ लाख चौरस मीटर क्षेत्र बाधित झाले आहे. भायखळा, ऐरोली, कसारा, विक्रोळी आणि ठाणे परिसरातही मोठ्या प्रमाणात रेल्वे जमीन अतिक्रमणाखाली गेली आहे. विशेष म्हणजे, ज्या जागांवर भविष्यात अतिरिक्त रेल्वेमार्ग, स्थानक विस्तार आणि इतर विकासकामे प्रस्तावित आहेत, त्याच जागांवर अतिक्रमणांचे जाळे पसरत आहे. त्यामुळे अनेक प्रकल्प रखडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
गरीब नगरमध्ये काही दिवसांत मोठी मोहीम उभी करणारे प्रशासन आता मध्य रेल्वेच्या हजारो झोपड्यांबाबत मात्र कारवाईसाठी पुढे का येत नाही, असा सवाल उपस्थित होत आहे. अतिक्रमणांचा आकडा वर्षानुवर्षे वाढत असताना प्रशासन फक्त कागदोपत्री नोंदी ठेवत आहे का, अशीही चर्चा सुरू आहे. रेल्वेच्या कोट्यवधी रुपयांच्या जमिनीवर हजारो झोपड्या उभ्या राहत असताना जबाबदार यंत्रणा नेमके काय करत होत्या, हा प्रश्न अधिक तीव्र झाला आहे. त्यामुळे कारवाई नेमकी केव्हा होणार आणि मोठी मोहीम राबविण्याचे धाडस प्रशासन दाखवणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कुर्ला-ट्रॉम्बे-५५९५ झोपड्या, ५०,३५५ चौ.मी.
कल्याण – ३,१६० झोपड्या, २,३५,९०० चौ. मी.
डोंबिवली २,९०२ झोपड्या, १,००,००० चौ. मी.
भायखळा -८०० झोपड्या, २१,६०० चौ.मी.
ऐरोली : ७९४ झोपड्या, ३१,३५५ चौ.मी.
कसारा : ५५९ झोपड्या, ७.३०२ चौ. मी.
घाटकोपर-विक्रोळी: ४१३ झोपड्या, २४,६५० चौ. मी.
ठाणे: ३६५ झोपड्या, ३.२८५ चौ.मी.