
जिल्हा परिषदेच्या २८३ शाळा क्रीडांगणाविना! क्रीडा विकासाला ब्रेक; अंजनगाव सुर्जीत स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचा प्रस्ताव प्रलंबित
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीणराव विकासावरी शिक्षणासोबतच खेळांनाही महत्त्वाचे स्थान आहे. शाळांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये खेळांची आवड निर्माण करण्यासाठी तसेच त्यांच्या शारीरिक विकासासाठी क्रीडांगण उपलब्ध असणे आवश्यक आहे. मात्र, अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांची या बाबतीतील स्थिती चिंताजनक असल्याचे समोर आले. जिल्ह्यातील १४ तालुक्यांमध्ये जिल्हा परिषदेच्या एकूण १,५७१ शाळा असून, त्यापैकी तब्बल २८३ शाळांकडे स्वतःचे क्रीडांगण उपलब्ध नाही.(फोटो सौजन्य – AI)
उपलब्ध आकडेवारीनुसार, जिल्हा परिषदेच्या १,५७१ शाळांपैकी १,२८८ शाळांमध्ये विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी मैदान उपलब्ध आहे. मात्र, २८३ शाळांमधील विद्यार्थ्यांना योग्य क्रीडांगणाअभावी अडचणींचा सामना करावा लागत आहे. शाळांच्या वेळापत्रकात दर आठवड्याला खेळांसाठी दोन ते चार तासांचा वेळ निश्चित करण्यात आला असतो. अशा परिस्थितीत मैदानच उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांसमोर ‘खेळायचे तरी कुठे?’ असा प्रश्न निर्माण झाला आहे. काही शाळांकडून विद्यार्थ्यांना क्रीडा उपक्रमांसाठी इतर उपलब्ध मैदानांवर नेले जाते. तर काही शाळा खासगी भूखंड, व्यायामशाळा, सार्वजनिक ठिकाणे अथवा सरकारी जमिनीचा वापर क्रीडा उपक्रम आणि स्पर्धांसाठी करीत आहेत. तसेच अंजनगाव सुर्जी तालुका मुख्यालयातही अद्याप स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उपलब्ध झाले नाही. स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचा प्रस्ताव दीर्घकाळापासून प्रलंबित आहे.
शहराच्या आसपास योग्य जागा उपलब्ध नसल्याने हा विषय पुढे सरकू शकलेला नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना चांगल्या क्रीडा सुविधा अखेर कधी मिळणार, हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे. सार्वजनिक ठिकाणांचा आधारः क्रीडांगण उपलब्ध नसले तरी विद्यार्थ्यांच्या क्रीडा उपक्रमांना पूर्णपणे ब्रेक लागला नाही. अनेक शाळा परिसरातील खासगी भूखंड, व्यायामशाळा, सार्वजनिक ठिकाणे अथवा सरकारी जमिनीचा वापर करून विद्याथ्यर्थ्यांना क्रीडा उपक्रमांमध्ये सहभागी करून घेत आहेत. मात्र, ही ठिकाणे कायमस्वरूपी आणि पुरेशा क्रीडा सुविधांना पर्याय ठरू शकत नाहीत.
शाळांची मान्यता आणि तपासणी प्रक्रियेत क्रीडांगणासह विविध आवश्यक सुविधांना महत्त्व दिले जाते. माध्यमिक शाळांची दर तीन वर्षांनी ११ निकषांच्या आधारे तपासणी केली जाते. यामध्ये क्रीडांगण, मुख्याध्यापक कक्ष, स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याची सुविधा, ग्रंथालय, अध्यापन-अध्ययन साहित्य तसेच शाळेची सुरक्षा आणि संरक्षक भिंत आदी सुविधांचा समावेश आहे. असे असतानाही जिल्हा परिषदेच्या २८३ शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी स्वतःचे क्रीडांगण उपलब्ध नसणे हा गंभीर प्रश्न आहे.