
बालेघर-आनंदपूर जोडरस्त्याच्या निधीसाठी अॅड. पिसाळ यांचा शिवेंद्रसिंहराजेंकडे पाठपुरावा; मांढरदेव भाविकांची अडचण दूर होणार
वाई : मौजे बालेघर ते मौजे आनंदपूर या जोडरस्त्याचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असून, हा रस्ता तातडीने मंजूर करून पूर्ण करावा, अशी मागणी बावधन गटाच्या नेत्या अॅड. दिप्ती पिसाळ यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे केली. या रस्त्यामुळे मांढरदेव देवस्थान येथे येणाऱ्या भाविकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय टळणार आहे.
सध्या पुणे-बंगलोर महामार्गापासून मांढरदेव येथे जाण्यास सुमारे ३० किलोमीटर अंतर पार करावे लागते; मात्र, बालेघर-आनंदपूर मार्ग तयार झाल्यास हे अंतर केवळ ५ ते ६ किलोमीटरपर्यंत कमी होणार आहे. यामुळे भाविकांचा वेळ व इंधनाची मोठी बचत होणार आहे. सदर मार्गातील सुमारे २ किलोमीटर कच्चा रस्ता सध्या अस्तित्वात असून, उर्वरित ४ किलोमीटरचा रस्ता तयार करणे अत्यंत गरजेचे आहे. हा रस्ता पूर्ण झाल्यास मांढरदेव देवस्थानासह पंचक्रोशीतील गावांच्या सांस्कृतिक आणि आर्थिक विकासाला चालना मिळणार असल्याचे अॅड. दिप्ती पिसाळ यांनी व्यक्त केले.
शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी या रस्त्याच्या निधीबाबत सकरात्मकता दर्शवली असून, हा रस्ता पूर्ण झाल्यास मांढरदेवला एनएच ४ वरून येणाऱ्या भाविकांचे मोठे अंतर वाचणार आहे. यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष राजू भोसले, जेष्ठ जिल्हा परिषद सदस्य वसंतराव मानकुमरे, जावळी पंचायत समितीचे सभापती सौरभ शिंदे, जितू पिसाळ, रोहित वाडकर आदी मान्यवर उपस्थित होते. अॅड. दिप्ती पिसाळ यांनी वाई शहर आणि तालुक्यातील अंतर्गत रस्त्यांसाठीही निधीची मागणी केली.
जावली तालुक्यात पाणी प्रश्नावरून बैठक
दुसरीकडे, जावली तालुक्यातील वाढत्या पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समिती सभागृहात महत्त्वाची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत तालुक्यातील विविध गावांतील पाणी टंचाईची सविस्तर चर्चा करण्यात आली असून, प्रशासनाला तात्काळ आणि प्रभावी उपाययोजना राबविण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले. शिवेंद्रराजेंनी प्रशासनाला विलंब न करता ठोस उपाययोजना करण्याचे आदेश दिले. विशेषतः ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची समस्या तीव्र होत असल्याने नवीन विंधन विहिरी खोदण्याचे काम खाजगी ठेकेदारांमार्फत तातडीने सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले.
जावलीतील पाणी टंचाईवर मंत्र्यांची तातडीची ‘अॅक्शन’; शिवेंद्रराजेंच्या बैठकीत कठोर निर्देश