
फोटो सौजन्य: Gemini
अहिल्यानगर जिल्ह्यात तापनान ४० अंश सेल्सियसला खेटायला आल्यानंतरच लाहीलाही होऊ लागली असून, हवामान खात्याने दिलेल्या अंदाजाप्रमाणे आकडा वाढल्यास या होईल, या धास्तीने नगरकर हवालदील झाले आहेत. जिल्हा रुग्णालयात उष्माघात कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. राज्यासह अहिल्यानगर जिल्ह्यात सध्या उन्हाचा तडाखा प्रचंड वाढला आहे. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील पारा ३९ अंश सेल्सिअसपर्यंत आलेला आहे.
वाढत्या उष्णतेमुळे जिल्ह्याभरातील जनजीवन अक्षरशः होरपळून निघाले आहे. दुपारच्या वेळी रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळत आहे. या भीषण उष्णतेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा आरोग्य प्रशासन सतर्क झाले असून, कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी जिल्हा रुग्णालयात विशेष उष्माघात कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. गेले काही दिवस झाले सकाळी १० वाजल्यापासूनच उन्हाच्या झळा लागण्यास सुरुवात होते. दुपारी १२ ते ४ या वेळेत उन्हाची तीव्रता जास्त असते. यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळल्याने शहरातील प्रमुख बाजारपेठा आणि रस्ते ओस पडत आहेत. शेतीकामांवरही याचा मोठा परिणाम झाला असून, मजूर आणि शेतकरी पहाटे किंवा रात्री कामाला प्राधान्य देत आहेत. अनेक भागात रात्री विजेच्या झोतात शेतीचे कामे सुरू असल्याचे चित्र आहे.
वाढती उष्णता लक्षात घेऊन जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून जिल्ह्यातील जनतेला सतर्कतेचे आवाहन केले आहे. दुपारी उन्हात घराबाहेर न पडणे, जवळ पाण्याची बाटली ठेवणे, डोक्यात टोपी किंवा पांढरा रुमाल घालणे आदी बाबी सांगून प्रत्येकाने आपली स्वतःची, वृद्ध व गरोदर माताची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.