
एकीकडे सरकार ‘झाडे लावा, झाडे जगवा’ असा नारा देत कोट्यवधी रुपये खर्च करत असताना, दुसरीकडे वन विभागाच्या निष्काळजीपणामुळे कोल्हार आणि परिसरातील हजारो एकर वनक्षेत्र आगीच्या भक्ष्यस्थानी पडले आहे. वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे केवळ वृक्षसंपदाच नव्हे, तर दुर्मिळ प्राणी आणि कीटकही जळून खाक झाले आहेत.
कोल्हार (ता. पाथर्डी) परिसरात वन विभागाचे सुमारे २००० एकर क्षेत्र आहे. हे क्षेत्र काही पाथर्डी तालुक्यात तर काही शेजारी असलेल्या नगर तालुक्यात येत आहे. नियमानुसार, उन्हाळा सुरू होण्यापूर्वी जंगलात आग पसरू नये म्हणून ‘जाळ रेषा’ आखणे अनिवार्य असते. मात्र, कोल्हार वन परिक्षेत्रात ही जाळ रेषाच मारली गेली नाही. परिणामी, एका ठिकाणी लागलेली आग वाऱ्याच्या वेगाने संपूर्ण डोंगरपट्टयात पसरली आणि सलग तीन दिवस वनसंपदा धुमसत राहिली. स्थानिक कार्यकर्ते आणि परिसरातील नागरिकांनी वेळोवेळी वन विभागाला जाळ रेषा आखण्याबाबत सूचित केले होते. अनेकांनी तशी विनंतीही केली. मात्र, आमच्याकडे निधी नाही, पैसे उपलब्ध नाहीत अशी थातूर-मातूर उत्तरे देऊन अधिकाऱ्यांनी जबाबदारी झटकली.
चीनमध्ये तयार होणारी कार चीनच्याच कंपनीला टक्कर देणार! 751 किमीची रेंज आणि बरंच काही
धक्कादायक बाब म्हणजे दरवर्षी नवीन वृक्षारोपणासाठी खड्डे खोदण्यास निधी मिळतो. रोपांना पाणी घालण्याच्या नावाखाली गैरप्रकार होत असल्याचे आरोप झाले आहेत. मात्र, तीच झाडे आगीपासून वाचवण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी वन विभागाकडे इच्छाशक्तीचा अभाव दिसून येतो.
या संपूर्ण प्रकाराला जबाबदार कोण? या दुर्घटनेला जबाबदार असणा-या वन कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई होणार का? अजूनही काही भागातील जंगल सुरक्षित आहे, तिथे तातडीने जाळ रेषा आखल्या जातील का ? वृक्षारोपणाच्या नावाखाली खर्च होणारा निधी प्रत्यक्ष जमिनीवर का दिसत नाही? असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित केले जात आहेत.
जळालेली झाडे आणि मुक्या प्राण्यांना गमवावा लागलेला जीव यामुळे परिसरातील वनप्रेमी नागरिक प्रचंड अस्वस्थ आहेत. ‘आम्ही वन विभागाला फोन करून आगीची माहिती दिली. सलग तीन दिवस एकही कर्मचारी या आगीकडे फिरकला नाही. स्थानिक तरुणांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला, पण पुरेशी साधनसामग्री नसल्याने निसर्गाचा हा ऱ्हास डोळ्यादेखत पहावा लागला’ अशी प्रतिक्रिया स्थानिक नागरिक व पर्यावरण प्रेमीनी व्यक्त केली.
‘वीजनिर्मिती व पुरवठा सुरळीत राहण्यासाठी AI चा…’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
या आगीत केवळ झाडेच जळाली नाहीत, तर सरपटणारे शेकडो प्राणी, दुर्मिळ कीटक आणि पक्षांची घरटी जळून खाक झाली आहेत. कोल्हार परिसरातील हा डोंगरपट्टा गेल्या ४-५ वर्षांपासून दरवर्षी आगीच्या विळख्यात सापडत आहे. तरीही वन विभाग नियमावर बोट ठेवून गप्प बसण्याचे काम करत आहे.
वन विभागाच्या बोगस कारभारामुळे सामान्य जनतेत मोठा रोष आहे. वरिष्ठानी या प्रकरणाची सखोल चौकशी करून कोल्हारचा डोंगर पुन्हा हिरवागार करण्यासाठी ठोस पावले उचलावीत, अशी मागणी होत आहे.