
माळीवाडा वेशीचा मुद्दा चिघळण्याची शक्यता; सत्ताधाऱ्यांच्या पत्राला विरोधकांचा आरोप
सुमारे चारशे वर्षापूर्वीची वास्तू म्हणून ही माळीवाडा वेस ऐतिहासिक ठेवा आहे, असे सांगत ही वेस पाडण्यास विरोध करण्यात आला आहे. मात्र या वेशीला मोठ्या प्रमाणात अतिक्रमणाचा विळखा आहे. शिवाय वेस जुनाट आणि पडायला झाली असल्याने भविष्यात तो धोका होऊ शकतो. याला पर्याय म्हणजे वेस पाडणे नव्हे, असे इतिहासप्रेमींचे म्हणणे आहे. काही संस्थांनी या वादात उडी घेत आपले इतिहासप्रेम आक्रमकतेने मांडले आहे. तसेच शिवसेनेच्या नगरसेवकांनीही वेस पाडण्यास विरोध केला आहे. तसेच पुरातत्त्व खात्यास पत्र देऊन ही वेस वाचविण्याचे साकडे घातले होते. पुरातत्त्व खात्याने या संदर्भात पत्र देत ही इतिहासाचा ठेवा असून, तो जतन करण्याचे सांगितले आहे.
एकीकडे हे सुरू असतानाच दुसरीकडे महापालिकेतील सत्तारूढ राष्ट्रवादी, भाजप व त्यांना पाठिंबा देणाऱ्या नगरसेवकांनी महापौर ज्योती गाडे यांना पत्र देत ही वेस पाडण्यास सहमती दर्शविली आहे. फुले दाम्पत्याचे स्मारक उभारतानाच तेथे विद्यतू रोषणाई, सुशोभीकरण करावे, संपूर्ण जागेला संरक्षक भिंत उभारावी, अशी मागणी केली आहे. तसेच या विषयासाठी स्वतंत्र विशेष महासभा घेण्याची मागणीही करण्यात आली आहे. हे पत्र देताच शिवसेनेचे शहरप्रमुख संभाजी कदम यांनी नगरसेवकांनी दिलेले पत्र रद्द करण्याची मागणी करणारे पत्र दिले आहे.
शिवसेनेचे शहरप्रमुख संभाजी कदम यांनी पत्रात म्हटले आहे, की माळीवाडा वेस ४०० वर्षांपूर्वीची ऐतिहासिक वास्तू असून, तिचे जतन करण्याचे पत्र पुरातत्त्व विभागाने दिले आहे. तसेच १० नोव्हेंबर २०१० मध्ये वेस पाडण्यास जिल्हा न्यायालयाने मनाई हुकूम दिला आहे. काही नगरसेवकांनी वेस पाडण्याबाबत पत्र दिले आहे. तसे घडल्यास आम्ही कायद्यानुसार गुन्हे दाखल करू.