
आंदोलना दरम्यान ‘न्याय द्या न्याय द्या, आमच्या मुलीला न्याय द्या’ ‘ॲसिड हल्ला करणाऱ्याला फाशीची शिक्षा द्या’ अशा घोषणांनी परिसर दाणाणला होता. घटनेला २४ तास उलटूनही आरोपी मोकाट आहे. पोलिसांनी तत्काळ त्याला पकडून त्याच्यावर कठोरातील कठोर कारवाई करत फाशीची शिक्षा द्यावी, अशी एकमुखी मागणी रस्त्यावर उतरलेल्या महिला, शाळकरी मुली व सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी केली आहे. ॲसिड हल्ला करणाऱ्याचा शोध घेण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी दहा पोलिस पथके रवाना केली आहेत. घटनास्थळाजवळ सीसीटीव्ही फुटेज नसल्यामुळे तपास कामात अडथळे येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. सुमारे एक तास रास्ता रोको आंदोलन सुरू असल्यामुळे लोणी व तळेगावच्या दिशेने येणाऱ्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. आंदोलन कर्त्यांच्या वतीने दिलेले निवेदन संगमनेर तालुक्याचे पोलिस निरीक्षक प्रवीण साळुंखे यांनी स्वीकारले.
ॲसिड हल्ल्याचा ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, माजी आ. डॉ. सुधीर तांबे, आ. सत्यजित तांबे आदींनी निषेध केला आहे. घटनेनंतर युवा नेत्या डॉ. जयश्रीताई थोरात व डॉ. तांबे यांनी प्रवरा हॉस्पिटलमध्ये जात मुलीची चौकशी केली. मुलीवरील उपचाराचा सर्व खर्च एसएमबीटी संस्था करणार असून त्या संदर्भात डॉ. जयश्रीताई थोरात यांनी मुंबई येथील वैद्यकीय तज्ज्ञांशी संपर्क केला आहे.
आमच्याच मैत्रिणीवर एका विकृताने ॲसिड हल्ला केला आहे. या घटनेमुळे आता आम्हालाही शाळेत जाण्याची भीती वाटत आहे, अशी प्रतिक्रिया आंदोलनात सहभागी झालेल्या शाळकरी विद्यार्थिनींनी दिली.
ॲसिड हल्ल्याची माहिती आ. अमोल खताळ यांना समजताच त्यांनी विधानसभा अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित केला. आरोपीवर कठोर कारवाई करतानाच जखमी मुलगी आणि तिच्या कुटुंबियांना शासनाकडून आर्थिक मदत देण्याची मागणी त्यांनी केली आहे. ग्रामीण भागात मुली आणि महिलांच्या सुरक्षेसाठी ग्रामपंचायतींनी महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, असे आवाहन नीलम खताळ यांनी केले आहे.
संगमनेरच्या नगराध्यक्षा डॉ. मैथिलीताई तांबे म्हणाल्या, संगमनेर शहरात महिलांच्या व मुलींच्या सुरक्षिततेसाठी रक्षक दल निर्माण केले आहे. तसेच ग्रामीण भागातही रक्षक दल निर्माण करावे लागतील.