
श्रीरामपूरच्या मसाला गल्लीत अदृश्य रसायनाचे बळी थांबता थांबेना!
अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरातील प्रभाग क्रमांक ७ मधील मसाला गल्ली परिसरात अज्ञात रसायनामुळे नागरिकांना त्रास होण्याचे प्रकार वाढत चालले आहेत. सुरुवातीला चार कर्मचारी, त्यानंतर कंत्राटदार आणि अधिकारी बाधित झाले होते. आता स्थानिक नागरिकांनाही त्याचा फटका बसल्याने या प्रकरणातील बाधितांची संख्या एकूण ९ वर पोहोचली आहे. त्यामुळे या परिसरात नेमके काय घडत आहे, याबाबत नागरिकांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली आहे. दरम्यान, यामागे अवैध रासायनिक दारू निर्मितीचा संशयही व्यक्त केला जात आहे.
मंगळवारी चार कर्मचारी आणि बुधवारी दोन अधिकारी बाधित झाल्यानंतर नगराध्यक्ष Karan Sasane यांनी तातडीने परिसर स्वच्छ करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पालिकेच्या आरोग्य विभागाने अग्निशमन दलाच्या मदतीने गटारींची प्रेशरने तीन वेळा स्वच्छता केली.
Mumbai-Ahmedabad मार्गावर धावणार भारतीय बनावटीची Bullet Train कधी धावणार? वाचा सविस्तर अपडेट
मात्र प्रशासन परतल्यानंतर संध्याकाळी पुन्हा नागरिकांना त्रास होण्याची घटना घडली. परिसरातील वृत्तपत्र विक्रेते राजाराम जाधव यांच्या पत्नी पुष्पा जाधव आणि मुलगा तुषार जाधव यांना तीव्र मळमळ आणि चक्कर येऊ लागली. पुष्पा जाधव यांना सलग तीन वेळा उलट्याही झाल्या. त्याचप्रमाणे शेजारी राहणाऱ्या सुवर्णा बुद्धऱ्हाडे यांना घशाला कोरड पडणे आणि श्वास घेण्यास त्रास जाणवू लागला. तिघांनीही तातडीने खासगी रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर त्यांची प्रकृती स्थिर झाली.
या घटनेचा नेमका उलगडा करण्यासाठी पालिकेने फवारणीसाठी वापरलेली कार्बोलिक पावडर नाशिकमधील Ashwamedh Laboratory येथे तपासणीसाठी पाठवली आहे. तसेच सांडपाण्याचे नमुने मुंबईतील Ana Lab कडे पाठवण्यात आले आहेत. मात्र अद्याप या नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले नसल्याने नागरिकांना त्रास नेमका कोणत्या रसायनामुळे होत आहे, हे स्पष्ट झालेले नाही. केमिकल ऑक्सिजन डिमांड (COD) चाचणी झाल्यानंतरच पाण्यातील रासायनिक घटकांबाबत निश्चित माहिती मिळणार आहे.
उन्हाळ्याच्या सुट्टीत गावी जायचंय? मग आता चिंता सोडाच; Central Railway ने घेतला ‘हा’ निर्णय
दरम्यान, या प्रकरणाला गुन्हेगारी वळण मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार, या परिसरात विदेशी बनावटीच्या दारूच्या रिकाम्या बाटल्या मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. मंगळवारच्या घटनेनंतर पालिकेने अशा अनेक बाटल्या जप्त केल्या आहेत. त्यामुळे कोणीतरी अवैध रासायनिक दारू तयार करून त्याचे सांडपाणी थेट गटारात सोडत असावा, असा संशय व्यक्त होत आहे. जंतूनाशक पावडर आणि त्या रसायनांच्या संयोगामुळे विषारी वायू तयार होत असावा, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
या प्रकरणाबाबत बोलताना नगराध्यक्ष Karan Sasane म्हणाले की, “नागरिकांचे आरोग्य हे आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे. परिसर स्वच्छतेची कारवाई तातडीने केली असली तरी महिलांना त्रास होणे दुर्दैवी आहे. गटारीमध्ये रासायनिक पदार्थ कोण टाकत आहे याचा शोध सुरू असून दोषींना सोडले जाणार नाही.”