
बिबट्यांचा मानवी वस्तीत मुक्तसंचार, खडकीमध्ये दहशत!
खडकीचे सरपंच भाऊसाहेब बहिरट यांनी सोमवारी (दि. २) ग्रामपंचायतीच्या वतीने महावितरणचे कार्यकारी अभियंता तसेच जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर केले. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, खडकी गावात तसेच परिसरात बिबट्या आणि इतर वन्यप्राण्यांचा मोठ्या प्रमाणात वावर दिसून येत आहे. प्रशांत नारायण कोठुळे यांच्या घरामागील भागात रावसाहेब कोठुळे यांना बिबट्याचे दर्शन झाले होते. तसेच दोन दिवसांपूर्वी जयसिंग रामचंद्र कोठुळे यांच्या घरासमोरही कुटुंबीयांनी बिबट्या पाहिल्याचे सांगितले आहे.
मानवी वस्तीत बिबट्यांचा वावर असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे प्रमाण वाढले आहे. काही महिन्यांपूर्वी बिबट्याप्रवण भागात दिवसा वीज देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र सध्या अनेक भागांत पुन्हा रात्रीचा वीजपुरवठा सुरू करण्यात आला आहे. परिणामी, रात्री पिकांना पाणी देण्यासाठी शेतात जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.
रब्बी हंगामातील सर्वच पिकांना सध्या पाण्याची आवश्यकता आहे. मात्र बिबट्यांच्या वावरामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र भीती पसरली असून, जीव मुठीत धरून शेती करावी लागत आहे. अशा परिस्थितीत शेतीसाठी दिवसा वीजपुरवठा सुरू करणे अत्यावश्यक असल्याची मागणी ग्रामपंचायतीने केली आहे.
जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारात AI चा मोठा वापर; शोकांतिकेनंतर पुण्यात ट्रोलिंगची धार मावळली
खारेकर्जुने येथे चिमुकलीचा बळी गेल्यानंतर आणि निंबळक परिसरात बालकावर बिबट्याचा हल्ला झाल्यानंतर प्रशासनाने तात्काळ दिवसा वीजपुरवठ्याचा निर्णय घेतला होता. मात्र सध्या तालुक्यातील बहुतांश भागात पुन्हा रात्रीचाच वीजपुरवठा सुरू आहे.
“दुर्घटना घडल्यानंतरच शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळणार का?” असा संतप्त सवाल सरपंच भाऊसाहेब बहिरट यांच्यासह ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. महावितरण कंपनी कोणतीही दुर्घटना घडण्याची वाट पाहत आहे का, असा रोष खडकी ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात येत आहे.