डिजिटल शाळा, पाणीपुरवठा योजना आणि रोजगार निर्मितीवर भर, महायुतीकडून विकासाचा १० कलमी 'वचननामा' जाहीर
धाराशिव : जिल्ह्यात अपूर्ण असलेल्या सगळ्या पाणीपुरवठा योजना प्राधान्याने पूर्ण केल्या जातील. गावातील प्रत्येक शाळा डिजिटल करून गावात विद्यार्थ्यांना स्मार्ट शिक्षण उपलब्ध करून देण्यात येईल यासोबतच पर्यटन व्यवसायाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मितीवर आपला भर असणार असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी जाहीर केले आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी महायुतीचा १० कलमी ‘वचननामा’ आमदार पाटील यांनी मंगळवारी प्रकाशित केला. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
प्रशासकीय कामात पारदर्शकता आणण्यासाठी आणि ग्रामीण भागातील नागरिकांचे जिल्हा परिषद कार्यालयातील हेलपाटे वाचवण्यासाठी ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ (AI) आणि व्हॉट्सॲप तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केला जाणार आहे. प्रलंबित विकासकामांच्या तक्रारी नोंदवण्यासाठी आणि त्यावर होणाऱ्या कारवाईचा मागोवा घेण्यासाठी विशेष ॲप विकसित केले जाईल, ज्यामुळे सर्वसामान्यांना घरबसल्या त्यांच्या मोबाईलवरच कामाची स्थिती कळू शकणार असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे. जिल्ह्यातील आरोग्य सुविधा बळकट करण्यासाठी ज्या गावांत कायमस्वरूपी दवाखाने नाहीत, तिथे दरमहा ‘सर्व रोग निदान शिबिर’ आयोजित करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. शिक्षणाच्या बाबतीत, जिल्हयातील शाळा ‘डिजिटल’ करण्यावर भर दिला जाणार आहे. विशेषतः रोबोटिक तंत्रज्ञानाचा वापर करून अध्यापन करण्याचे पायलट प्रोजेक्ट राबवण्याचे नियोजन आहे, ज्यासाठी सौर आणि पवन ऊर्जा कंपन्यांच्या CSR निधीचा वापर केला जाईल असेही त्यांनी सांगीतले.
जिल्ह्यातील महिला बचत गटांच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ मिळवून देण्यासाठी तुळजापूर येथे जिल्हा परिषदेच्या जागेवर भव्य ‘उमेद मॉल’ उभारला जाणार आहे. याशिवाय, पुरातत्व उत्खनन पर्यटकांना प्रत्यक्ष पाहता यावे, यासाठी ‘लाईव्ह आर्किओलॉजिकल डिग’ अर्थात उत्खननाची जिवंत प्रयोगशाळा प्रकल्प राबवला जात आहे, त्यासाठी आपण १२ ते १३ कोटी रुपये मंजूर करून आणले असल्याची माहितीही आमदार पाटील यांनी यावेळी दिली. उस्मानाबादी शेळीच्या ब्रीडिंग आणि रेअरिंगसाठी केंद्राकडून विशेष आर्थिक मदत मिळवून दिली जाईल. प्रलंबित पाणीपुरवठा योजना पूर्ण करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले जाणार आहेत. तसेच, गाव तिथे पक्के रस्ते आणि ‘पानंद रस्ते’ अडवणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी आमदारांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती स्थापन केली जाणार असल्याची माहितीही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी यावेळी दिली.






