पुणे जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारामध्ये एआयचा वापर वाढला आहे (फोटो - istock)
पुणे : आकाश ढुमेपाटील : पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचा (Pune News) प्रचार निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे. यंदाच्या रणधुमाळीत एक महत्त्वाचा बदल ठळकपणे जाणवतो आहे, तो म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता अर्था AI वर आधारित प्रचाराचा मोठ्या प्रमाणात वापर झाला आहे. पोस्टर, फलक, घोषवाक्ये यापुरता मर्यादित असलेला प्रचार आता थेट कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित व्हिडिओ, आवाज-मांडणी, शॉर्ट मुव्ही आणि वैयक्तिक संदेशांपर्यंत पोहोचला आहे. (AI Technology)
दुसरीकडे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर पुणे जिल्ह्यातील राजकीय वातावरणात एक वेगळाच बदल दिसून येत आहे. सामाजिक माध्यमांवरील टोकाच्या टीकेची तीव्रता लक्षणीयरित्या कमी झाली आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता प्रचाराचा वापर हा केवळ तांत्रिक नव्हे, तर रणनीतिक बदल मानला जात आहे. कमी वेळात अधिक मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवार आणि पक्षांनी या तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर सुरू केला आहे. मतदारसंघनिहाय स्थानिक मुद्द्यांवर आधारित चित्रफिती, गावागावातील प्रश्नांवर भाष्य करणारे डिजिटल संदेश आणि मतदारांच्या भावनांना हात घालणारी दृश्य-श्राव्य मांडणी—या साऱ्यामुळे प्रचार अधिक धारदार, पण तुलनेने शांत आणि नियोजित झाला आहे. विशेषतः तरुण मतदारांमध्ये या माध्यमाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे.
हे देखील वाचा : 22 तास अन्न, पाण्याशिवाय…! Mumbai-Pune Express वे ठप्प अन् सरकार गप्प; सर्व एसटी बस रद्द
या तांत्रिक झेपेची दुसरी बाजूही चर्चेत आहे. काही राजकीय अभ्यासकांच्या मते, कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे प्रचार अधिक प्रभावी झाला असला, तरी प्रत्यक्ष मानवी संवादाची उब कमी होण्याची शक्यता आहे. घरोघरी जाऊन संवाद साधणे, प्रत्यक्ष सभा-मेळावे यांची जागा जर केवळ पडद्याने घेतली, तर लोकशाही संवादाची खोली कमी होईल, अशी भीतीही व्यक्त केली जात आहे. मात्र सध्याच्या वेगवान प्रचारयंत्रणेत, कृत्रिम बुद्धिमत्ता हे टाळता न येणारे साधन बनले आहे, हेही तितकेच खरे आहे.
दरम्यान, अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर पुणे जिल्ह्यातील राजकीय चर्चेचा सूर बदललेला दिसतो. याआधी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सामाजिक माध्यमांवर आरोप-प्रत्यारोप, वैयक्तिक टीका आणि छळमोहीमेचा मारा सुरू होता. मात्र या घटनेनंतर संवेदनशीलता, संयम आणि मौन यांना अधिक स्थान मिळाले आहे. अनेक पक्षांनी आक्रमक प्रचार आवरता घेतला असून, वैयक्तिक टीकेऐवजी मुद्देसूद मांडणीवर भर दिला जात आहे.
हे देखील वाचा : पुणे जिल्ह्यातील ‘हे’ ठिकाण बनणार Bullet Train चे हब; तब्बल 4 हजार…
हा बदल केवळ भावनिक नाही, तर राजकीय गणिताचाही भाग असल्याचे मानले जाते. शोकाकुल वातावरणात आक्रमक छळमोहीम राबविल्यास त्याचा उलटा परिणाम होऊ शकतो, याची जाणीव सर्वच राजकीय पक्षांना झाली आहे. परिणामी, सामाजिक माध्यमांवरही अधिक नियंत्रित, संदेशप्रधान आणि तुलनेने सभ्य प्रचार दिसून येत आहे.
एकूणच, यंदाच्या जिल्हा परिषद निवडणुकांत कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वाढता प्रभाव आणि सामाजिक माध्यमांवरील बदललेला सूर हे दोन प्रवाह समांतरपणे पुढे जात आहेत. तंत्रज्ञान प्रचाराला नवी दिशा देत असताना, शोकांतिकेने राजकारणाला क्षणिक का होईना, पण माणुसकीची जाणीव करून दिली आहे. ही निवडणूक केवळ सत्तासमीकरणांची नसून, बदलत्या राजकीय संस्कृतीचीही साक्ष देणारी ठरत आहे.






