
राहुरीमध्ये पोटनिवडणुकीत उमेदवार देणे पवारांचे षडयंत्र!
अहिल्यानगर महाविकास आघाडी बारामतीसाठी एक नियम आणि राहुरीसाठी दुसरा नियम लावत आहे. बारामतीमध्ये ते सामंजस्य दाखवू शकतात, तर राहुरीमध्ये का नाही? असा सवाल उपस्थित करून हे राजकारण जुने असून हे पवारांचे षडयंत्र असून विखे परिवाराने अशी अनेक राजकीय षडयंत्रे अनुभवली आहेत. आम्ही मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण ताकदीने लढू, असा विश्वास भाजप प्रदेश उपाध्यक्ष माजी खा. डॉ. सुजय विखे यांनी केले.
राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीतील प्रचाराच्या नियोजनासाठी भाजपची बैठक झाली. यावेळी आ. संग्राम जगताप उपस्थित होते. बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना डॉ. विखे पाटील म्हणाले, स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांनी केलेले कार्य आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या विकासकामांच्या जोरावर अक्षय कर्डिले आमदार झालेले दिसतील.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बारामती आणि राहुरी या दोन्ही पोटनिवडणुका बिनविरोध व्हाव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली होती. मात्र, महाविकास आघाडीने बारामतीमध्ये माघार घेतली असली तरी राहुरीमध्ये उमेदवार रिंगणात उतरवला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यात चर्चा होऊनही महाविकास आघाडीने उमेदवार दिला, हे पवारांचेच षडयंत्र आहे. राहुरी पोटनिवडणूक न लढविण्याचा निर्णय माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी घेतल्याबद्दल डॉ. विखे यांनी त्यांचे कौतुक केले. ते म्हणाले, प्राजक्त तनपुरे यांनी मनाचा मोठेपणा दाखवला आहे. स्व. कर्डिले यांच्याबद्दलची भावना आणि त्यांचे संवेदनशील व्यक्तिमत्व या निर्णयातून दिसते.
राहुरी पोटनिवडणूक ताकदीने लढवा, कोणीही गाफील राहू नका. सर्वांना सोबत घेऊन प्रचार यंत्रणा मजबूत करा. स्व. कर्डिले यांनी २५ ते ३० वर्षे नगर तालुका एकसंघ ठेवला. त्यांच्या जनसेवेची परंपरा शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवा आणि त्यांच्या विकास कामांवर मते मागा, असे आवाहन डॉ. विखे पाटील यांनी केले.
बारामती व राहुरी पोटनिवडणुकीत अनुक्रमे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि अक्षय कर्डिले मोठ्या मताधिक्याने विजयी होतील. स्व. अजितदादा पवार आणि स्व. शिवाजीराव कर्डिले यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी एकजुटीने काम करावे, असे आवाहन आ. संग्राम जगताप यांनी केले.