
जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या कामांबाबत आमदार दाते यांनी स्पष्टपणे सांगितले की, कोणत्याही परिस्थितीत कामाच्या गुणवत्तेत तडजोड होणार नाही. नागरिकांच्या तक्रारी आल्यास संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष स्थळी जाऊन तपासणी करून तत्काळ तोडगा काढावा, तसेच सर्व कामे वेळेत पूर्ण व्हावीत यासाठी काटेकोर नियोजन करण्याचे निर्देश त्यांनी दिले. पारनेर पंचायत समितीच्या सभागृहात टंचाई व विविध विकासकामांची आढावा बैठक पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार काशिनाथ दाते यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात व शिस्तबद्ध वातावरणात पार पडली.
गटविकास अधिकारी दिलीप सोनकुसळे यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत तालुक्यातील विविध विभागांच्या कामांचा सखोल आढावा घेत प्रशासनाला अधिक गतिमान व लोकाभिमुख करण्यासाठी महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आल्या. विविध लोकप्रतिनिधी, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Ahilyanagar News: वाढत्या उष्णतेमुळे जिल्हा होरपळतोय! जिल्हा रुग्णालयात उष्मघात कक्षाची स्थापना
ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या कामांचा आढावा घेताना जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या योजनांची प्रत्यक्ष पाहणी करून ग्रामस्थांच्या तक्रारी जाणून घेण्याचे आदेश देण्यात आले. अपूर्ण कामांना पूर्णत्वाचा दाखला देऊ नये, तसेच १ जूनपर्यंत संपूर्ण अहवाल सादर करण्याचे निर्देश देत योजनांची गुणवत्ता व पारदर्शकता राखण्यावर त्यांनी भर दिला. त्याचबरोबर लघु पाटबंधारेची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याबाबतही सूचना देण्यात आल्या.
घरकुल योजनांच्या आढाव्यात प्रधानमंत्री आवास, रमाई, शबरी आदी योजनांतील अपूर्ण घरे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले. लाभार्थ्यांशी थेट संवाद साधून कामे गतीने पूर्ण करण्याचे निर्देश देताना आमदार दाते यांनी नुकत्याच पार पडलेल्या अधिवेशनात त्यांनी मांडलेल्या मागणीचा उल्लेख केला आणि राज्य शासनाने घरकुल अनुदानात ५० हजार रुपयांची वाढ केल्याची महत्त्वाची माहिती दिली. या निर्णयामुळे ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
‘लाडकी बहिण’ योजनेतील अपूर्ण ई-केवायसीसाठी विशेष शिबिरे आयोजित करण्याचे, आरोग्य विभागाने लसीकरण मोहिम वेळेत पूर्ण करण्याचे तसेच पशुसंवर्धन विभागाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित भरपाई देण्याचे निर्देश देण्यात आले. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत प्रलंबित कामे तात्काळ पूर्ण करण्यासाठी ठेकेदारांवर कठोर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला.
तालुक्यातील पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर सध्या सुरू असलेल्या टँकर पाणीपुरवठ्याचा आढावा घेत कायमस्वरूपी उपाययोजनांवर भर देण्याच्या सूचना करण्यात आल्या. रोजगार हमी योजनेतील कामांना गती देऊन अधिकाधिक नागरिकांना लाभमिळावा, यासाठी प्रशासनाने सक्रिय भूमिका घ्यावी असेही त्यांनी सांगितले.