ajit pawar on reservation
मुंबई : राज्यामध्ये सध्या आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आलेला आहे. लवकरच विधानसभा निवडणूका होणार असल्यामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा महत्त्वपूर्ण ठरणार आहे. मागील महिन्यांमध्ये झालेल्या लोकसभा निवडणूकीवर देखील मराठा आरक्षणाचा परिणाम दिसून आला. यामुळे महायुतीला राज्यामध्ये मोठा फटका बसला. त्यानंतर आता महायुतीकडून सावधानगी बाळगली जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देखील मराठा आरक्षण ओबीसीमधून द्यावे का असा सवाल करण्यात आला आहे. यावर अजित पवार यांनी आरक्षणाबाबत त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.
काय म्हणाले अजित पवार?
एका माध्यमांशी संवाद साधताना आरक्षणाबाबत अजित पवार यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. ते म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण मिळायला पाहिजे, असं माझं स्पष्ट मत आहे. मराठा समाजात गरीब कुटुंबांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे त्यांनाही इतरांच्या बरोबरीला येण्यासाठी शिक्षण व नोकरीत आरक्षण मिळायला पाहिजे”. अशी भूमिका अजित पवार यांनी घेतली आहे. त्याचबरोबर मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्याबाबत देखील अजित पवार यांनी मत मांडले आहे.
समंजस भूमिका घेऊन त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न
मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांची भूमिका आहे की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिलं जावं, दुसऱ्या बाजूला ओबीसींचा त्यास विरोध आहे. याबाबत तुमची भूमिका काय? यावर अजित पवार म्हणाले, “सर्वपक्षीय बैठकीत यावर चर्चा करायला हवी. मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. दुर्दैवाने काही पक्ष व काही पक्षांचे नेते त्या बैठकीला येऊ शकले नव्हते. आता लोकसभेचे अधिवेशन संपत आहे त्यामुळे विविध पक्षांचे खासदार व प्रमुख नेते या अधिवेशनातून मोकळे होते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा ही बैठक आयोजित केली पाहिजे. या बैठकीत सर्व पक्षांचं नेत्यांचं मत जाणून घेऊन मराठा समाजावर अन्याय होणार नाही याची खबरदारी घेऊन निर्णय घेतला पाहिजे. समंजस भूमिका घेऊन त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करायला हवा. कारण हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. इतर राज्यांचा महाराष्ट्राकडे बघण्याचा दृष्टिकोनही तोच आहे, असे मत अजित पवार यांनी मांडले आहे.