शेतकरी कर्जमाफीवरून कृषिमंत्र्यांचं मोठं विधान; 'एकही शेतकरी वंचित राहणार नाही...'
अकोला : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या पहिल्या टप्प्यात अकोला जिल्ह्यातील १९ हजार ९१० शेतकऱ्यांना एकूण १६९ कोटी ३६ लाख रुपयांच्या कर्जमुक्तीचा लाभ वितरित करण्यात आला आहे. जिल्ह्यातील प्रत्येक पात्र शेतकऱ्याला या योजनेचा लाभ मिळणार असून, एकही पात्र शेतकरी लाभापासून वंचित राहणार नाही, अशी ग्वाही राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अॅड. आकाश फुंडकर यांनी दिली.
शेतकरी सक्षम, शेती समृद्ध आणि महाराष्ट्र अधिक प्रगत करण्याच्या उद्देशाने शासनाने ही योजना सुरू केली आहे. शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या दिशेने हा महत्त्वपूर्ण निर्णय असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. योजनेतील पात्र लाभार्थ्यांची यादी संबंधित बँकांनी महाआयटीने विकसित केलेल्या पोर्टलवर अपलोड केली आहे. तसेच ही यादी ग्रामपंचायत कार्यालये, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था आणि संबंधित बँक शाखांमध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे.
यादीतील प्रत्येक पात्र शेतकऱ्याला विशिष्ट क्रमांक देण्यात आला आहे. या क्रमांकाच्या आधारे शेतकऱ्यांनी आपले सरकार सेवा केंद्रावर अॅग्रीस्टॅकवर नोंदणी करून आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहनही पालकमंत्र्यांनी यावेळी सर्व पात्र शेतकऱ्यांना केले आहे.
पीककर्ज उपलब्ध करून देण्याचे निर्देश
अमरावती विभागातील १ लाख ५८ हजार १४६ शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांमध्ये कर्जमुक्तीचा १ हजार ३७२ कोटी १७ लाख रुपयांचा लाभ जमा करण्यात आला आहे. तसेच राज्यात पहिल्या टप्प्यात आधार प्रमाणीकरण पूर्ण झालेल्या ६ लाख २२ हजार शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांमध्ये ५ हजार २८ कोटी रुपयांची रक्कम थेट जमा करण्यात आली आहे.
बँकांनी तातडीने खरीप पीककर्ज उपलब्ध करून द्यावे
कर्जमुक्तीचा लाभ मिळालेल्या पात्र शेतकऱ्यांना बँकांनी तातडीने खरीप पीककर्ज उपलब्ध करून द्यावे, असे निर्देश शासनाने दिले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना नव्याने खरीप हंगामाची तयारी करण्यासाठी आवश्यक आर्थिक बळ मिळणार आहे. ही योजना पूर्णपणे ऑनलाइन असून, शेतकऱ्यांना स्वतंत्रपणे कोणताही अर्ज करण्याची आवश्यकता नाही. पात्र लाभार्थ्यांनी यादीतील विशिष्ट क्रमांकाच्या आधारे अॅग्रीस्टॅक नोंदणी आणि आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.






