
Railway
अकोला, ब्युरो : नवरात्री पूर्वी दोन महत्वाच्या शक्तीपिठांना जोडणारी प्रवासी रेल्वे गाडी सुरू करा, अशी महत्वपूर्ण मागणी विदर्भ यात्री संघाने रेलमंत्री अश्विनीकुमार वैष्णव, रेल राज्यमंत्री वीरन्ना सोमन्ना व रेल्वे बोडांचे अध्यक्ष तथा सीईओ सतीश कुमार, मध्य रेल्वेचे महाप्रबंधक राजीव श्रीवास्तव, दक्षिण पूर्व रेल्वेचे महाप्रबंधक अनिलकुमार जैन, मंडल रेल प्रबंधक मध्य रेल्वे पुणे राजेश वर्मा, भुसावळचे पुनीत अग्रवाल यांच्याकडे केली आहे.
मागणीनुसार, भक्तांच्या सोयीसाठी दोन महत्त्वपूर्ण शक्तिपीठांना जोडणारी हावडा कोल्हापूर नवीन प्रवासी गाडी नवरात्री उत्सवाच्या आधी सुरू करावी. हावडा येथे महाकाली माता हे शक्तिपीठ आहे व कोल्हापूर येथे महालक्ष्मी हे शक्तिपीठ आहे. या नवीन प्रवासी गाडीमुळे हावडाजवळ असलेले गंगासागर येथे जाणाऱ्या भक्तांना सुद्धा सोयीस्कर होईल. आज हावडा कोल्हापूर दरम्यान कोणतीच प्रवासी गाडी उपलब्ध नाही. त्यामुळे प्रवाशांना बराच त्रास होतो. गत काही वर्षापासून रेल्वे प्रशासन हे अनेक तीर्थक्षेत्रांना आपसात जोडण्याचे प्रयत्न करीत आहे. या परंपरेला कायम ठेवून हावडा कोल्हापूर दरम्यान नवीन प्रवासी गाडीमार्गे बिलासपूर रायपूर नागपूर अकोला जळगाव पुणे सुरू करावी, असे निवेदन विदर्भ यात्री संघाचे अध्यक्ष डॉ. रवी आलिमचंदानी, अशोक अग्रवाल, दीप मनवाणी, अॅड. मिश्रा, डॉ. आशुतोष कुलकर्णी, डॉ. गद्रे, डॉ. दुष्यंत, राजू अकोटकर मास्टर, लवेश गोपपंजाबी आदींनी दिले आहे.
अनेक तीर्थक्षेत्रांना आपसात जोडणारी ११४०३/११४०४ नागपूर-कोल्हापूर दरम्यान धावणारी ही द्विसाप्ताहिक गाडी दररोज करण्यात यावी. यामुळे भक्तांना कोल्हापूरची देवी महालक्ष्मी, तुळजापूरची तुळजाभवानी (धाराशिव), पंढरपूरचे भगवान विठ्ठल-रुक्माई (कुडुवाडी), स्वामी समर्थ अक्कलकोट, बार्शी टाउन येथील भगवान विष्णूचे प्राचीन मंदिर, तसेच परळी वैजनाथ (बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक) येथे दर्शनासाठी जाण्या-येण्यात मोठी सोय होईल. रेल्वे प्रशासन सध्या अशा सोयी-सुविधांकडे विशेष लक्ष देत आहे. केवळ एका गाडीचे फेरे वाढवल्यास इतक्या सर्व तीर्थक्षेत्रांमध्ये प्रवास करणे सोपे होईल.