सौजन्य - नवराष्ट्र टीम
रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, रोजगार तसेच शहराच्या मूलभूत सुविधांबाबत कोण प्रभावी भूमिका बजावू शकतो, याचा गांभीर्याने विचार मतदारांनी केल्याचे दिसून येते. शहरातील विविध प्रभागांमध्ये विकासकामांचे मुद्दे केंद्रस्थानी राहिले. अनेक ठिकाणी अपूर्ण कामे व रखडलेले प्रकल्प, तर काही भागांत झालेली विकासकामे हेच प्रचाराचे मुख्य मुद्दे ठरले. ‘काम केले की नाही’ या एकाच प्रश्नावर अनेक उमेदवारांची राजकीय परीक्षा झाली आहे.
तरुण नेतृत्वाचा उदय
या निवडणुकीचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे मोठ्या प्रमाणावर तरुण उमेदवारांचे मैदानात उतरणे. अनेक तरुण प्रथमच नगरपालिकेत प्रवेश करण्याच्या तयारीत असून, त्यांनी ‘बदल’, ‘नवीन विचार’ आणि ‘पारदर्शक कारभार’ या मुद्द्यांवर प्रचार केला. तरुण मतदारांमध्येही या उमेदवारांविषयी विशेष उत्सुकता दिसून आली. उद्याचा निकाल नव्या नेतृत्वाच्या दिशेने वाटचाल करतो की अनुभवी चेहऱ्यांनाच पुन्हा संधी देतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता
मतमोजणी उद्या (दि. २१) सकाळी पार पडणार असून, सकाळी ११ वाजेपर्यंत निकाल हाती येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. निकाल जाहीर होताच शहराच्या राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता आहे. निकालाच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांचे समर्थक, कार्यकर्ते आणि नागरिकांमध्ये प्रचंड उत्सुकता असून, काही ठिकाणी विजयाचा आत्मविश्वास तर काही ठिकाणी चिंतेचे वातावरण दिसून येत आहे.






