
या आंदोलनाचे नेतृत्व संघटनेचे अध्यक्ष अक्षय कांबळे यांनी केले. “देशातील तरुणांना कमी लेखणारी भाषा कोणत्याही जबाबदार पदावरील व्यक्तीकडून अपेक्षित नाही,” असे सांगत कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. आंदोलनात पूजा बनसोडे, आदित्य गायकवाड, संदीप जाधव, अजय गाडगे, राज काकडे, जुबेर शेख यांच्यासह अनेक युवक सहभागी झाले होते.
आंदोलनानंतर निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनात तरुणांच्या भावना दुखावतील अशी वक्तव्ये टाळण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच युवकांना शासकीय योजनांचा लाभ घेताना येणाऱ्या अडचणींबाबतही प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले.
संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, विविध रोजगार व स्वयंरोजगार योजनांसाठी अर्ज करताना युवकांना कर्ज प्रक्रियेमधील विलंब, जाचक कागदपत्रे आणि प्रशासकीय अटींचा मोठा सामना करावा लागत आहे. योजनांची घोषणा मोठ्या प्रमाणावर केली जाते; मात्र प्रत्यक्षात अनेक पात्र युवक लाभापासून वंचित राहत असल्याचा आरोप त्यांनी केला.
दरम्यान, झुरळाचा पोशाख परिधान करून करण्यात आलेल्या या आंदोलनामुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात काही काळ उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले होते. नागरिक आणि येणाऱ्या-जाणाऱ्यांचे लक्ष या आंदोलनाकडे वेधले गेले असून शहरात दिवसभर या आंदोलनाची चर्चा सुरू होती.