
Amravati News: हेल्मेट सक्तीचा गैरफायदा? अमरावतीत बनावट हेल्मेटची विक्री; नागरिकांच्या जीवाशी खेळ
गेल्या आठ वर्षांपासून ग्राहक संरक्षण आणि रस्ता सुरक्षा क्षेत्रात कार्यरत असलेल्या या संस्थेने जागतिक आरोग्य संघटना तसेच देशातील रस्ते अपघातांच्या आकडेवारीचा दाखला देत दर्जेदार हेल्मेटचे महत्त्व अधोरेखित केले आहे. हेल्मेट सक्तीचा निर्णय हा नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि वाहतूक शिस्तीसाठी अत्यंत आवश्यक व स्वागतार्ह असल्याचे संस्थेने स्पष्ट केले. मात्र, त्याचवेळी निकृष्ट हेल्मेटचा वाढता बाजार हा या निर्णयालाच हरताळ फासणारा ठरत असल्याची चिंता व्यक्त करण्यात आली. निवेदनात दिल्लीतील काही हेल्मेट उत्पादकांचे परवाने संपुष्टात आलेले किंवा रद्द झालेले असतानाही त्यांच्या नावाने हेल्मेटची विक्री सुरू असल्याचा दावा करण्यात आला आहे. अमरावतीतही अशा हेल्मेटची विक्री होत असल्याचे पुरावे, छायाचित्रे आणि संबंधित ठिकाणांची माहिती संस्थेकडे उपलब्ध असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
संस्थेचे स्वयंसेवक अनुराग चौहान यांनी प्रशासनाला आवाहन करताना सांगितले की, रस्त्यालगत आयएसआय मानांकन नसलेली किंवा बनावट हेल्मेट विकणाऱ्या विक्रेत्यांविरोधात विशेष तपासणी मोहीम राबवून अशा हेल्मेटचा साठा जप्त करण्यात यावा. तसेच बाजारात केवळ प्रमाणित आणि दर्जेदार हेल्मेटच उपलब्ध राहतील, याची प्रशासनाने खात्री करावी.
भायखळा पोलीस ठाण्यात आगीचा तांडव! अग्निशमन दलाकडून वेळेत आग आटोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
हेल्मेट सक्तीमुळे मागणीत मोठी वाढ झाल्याचा फायदा घेत काही उत्पादक आणि विक्रेते निकृष्ट दर्जाची हेल्मेट बाजारात आणत असल्याचा आरोप संस्थेने केला आहे. अवघ्या १०० ते २०० रुपयात खर्चात तयार होणारी ही हेल्मेट तब्बल एक हजारपर्यंत विकली जात असून, अपघाताच्या वेळी ती चालकाचे संरक्षण करण्यात पूर्णपणे अपयशी ठरू शकतात. त्यामुळे स्वस्त आणि बनावट हेल्मेटमुळे नागरिकांचा जीव धोक्यात येत असल्याची गंभीर बाब संस्थेने प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली आहे. यामुळे हेल्मेट सक्तीची प्रभावी अंमलबजावणी करण्याबरोबरच बनावट आणि निकृष्ट हेल्मेटविरोधात विशेष मोहीम राबविण्याची गरज असल्याची मागणी पुढे आली आहे.