
आषाढीसाठी एसटीची मेगा तयारी, ५,५०० विशेष बस धावणार; ४० भाविक जमवा, गावातून थेट पंढरपूर गाठा; मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
पंढरपूर | शिवाजी हळणवर : आषाढी यात्रेनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी राज्यभरातून येणाऱ्या लाखो वारकरी भाविकांच्या सोयीसाठी राज्य परिवहन महामंडळाने यंदा ५ हजार ५०० विशेष एसटी बस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे कोणत्याही गावातून ४० किंवा त्यापेक्षा अधिक भाविकांनी एकत्रित नोंदणी केल्यास त्या गावातून थेट पंढरपूरपर्यंत विशेष बस उपलब्ध करून दिली जाणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केली.
आषाढी यात्रेच्या नियोजनाचा आढावा घेण्यासाठी चंद्रभागा बसस्थानक येथे झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर, नगराध्यक्षा डॉ. प्रणिता भालके, प्रांताधिकारी सचिन इथापे, सहायक पोलिस अधीक्षक प्रशांत डगळे, प्रादेशिक परिवहन अधिकारी नेरपगार, तहसीलदार सचिन लंगुटे, मुख्याधिकारी महेश रोकडे, विभागीय वाहतूक नियंत्रक अमोल गोंजारी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत सरनाईक यांनी यात्राकाळात सर्व बसेसची अंतर्गत व बाह्य स्वच्छता, निर्जंतुकीकरण, आषाढी यात्रेसाठी विशेष बससेवा असे फलक लावणे, चालक-वाहकांच्या आरोग्य तपासणीची व्यवस्था तसेच परतीच्या प्रवासासाठी स्वतंत्र मार्गनिहाय रांगा करून गर्दीचे शिस्तबद्ध नियोजन करण्याच्या सूचना दिल्या. प्रवाशांशी सौजन्याने वागण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
यंदाच्या विशेष बससेवेत शासनाच्या सर्व प्रवासी सवलती कायम राहणार आहेत. ‘अमृत ज्येष्ठ नागरिक योजना’ अंतर्गत ७५ वर्षांवरील नागरिकांना मोफत प्रवास, तर ‘महिला सन्मान योजना’ अंतर्गत महिलांना तिकीट दरात ५० टक्के सवलत मिळणार आहे. विशेष बससाठी भाविकांनी आपल्या जवळच्या एसटी आगारात नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मागील वर्षी आषाढी यात्रेत एसटीने ५,१४५ विशेष बस चालवत २१ लाख ९५ हजार भाविकांची सुरक्षित ने-आण केली होती. यंदा त्यापेक्षा अधिक व्यापक नियोजन करण्यात आले असून, एकादशीनंतरच्या परतीच्या गर्दीसाठी ३६ हून अधिक वाहतूक नियंत्रक व सुरक्षा रक्षक नियुक्त केले जाणार आहेत.
भाविकांच्या सुविधेसाठी चंद्रभागा, भीमा (देगाव), विठ्ठल कारखाना आणि पांडुरंग (आयटीआय महाविद्यालय) येथे चार तात्पुरती बसस्थानके उभारण्यात येत आहेत. या ठिकाणी पिण्याचे पाणी, सुलभ शौचालय, संगणकीय आरक्षण केंद्र, चौकशी कक्ष, मार्गदर्शन फलक, सीसीटीव्ही आणि अन्य सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.यात्रेदरम्यान रात्रंदिवस सेवा बजावणाऱ्या १३ हजार चालक, वाहक, यांत्रिक कर्मचारी, पर्यवेक्षक व अधिकाऱ्यांसाठी चहा, नाश्ता आणि भोजनाची व्यवस्था परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्वखर्चाने करण्याची घोषणा केली.
आषाढी यात्रेच्या तयारीचा भाग म्हणून परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी देगाव येथील भीमा तात्पुरत्या बसस्थानकाची पाहणी केली. वारकरी भाविकांसाठी उभारण्यात आलेल्या पिण्याचे पाणी, स्वच्छता, आरोग्य सुविधा, संगणकीय आरक्षण केंद्र, चौकशी कक्ष, मार्गदर्शन फलक, सीसीटीव्ही यंत्रणा आणि सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.