भरपावसात रस्त्याचे डांबरीकरण, सार्वजनिक बांधकाम विभागाचा प्रताप
कर्जत : कर्जत तालुक्यातील कोठींबे जामरुंग रस्त्यावर एक किलोमिटर लांबीचा रस्ता भर पावसात डांबरीकारण करण्यात येत होता.अवकाळी पाऊस आणि सुरू असलेले डांबरीकरण याबाबतचे व्हिडीओ व्हायरल झाल्यावर सार्वजनिक बांधकाम खात्याने संबंधित रस्त्यावरील डांबरीकरण पावसाचा जोर कमी झाल्यावर नव्याने करण्याचे आदेश ठेकेदाराला दिले आहेत. दरम्यान,भर पावसात करण्यात आलेले डांबरीकरण हे दोन दिवसांनी धुवून निघाले असल्याचे स्पष्ट दिसत आहेत.
तालुक्यातील कशेले भागातील कोठिंबे पासून पुढे जामरुंग आंबिवली रस्त्याचे कार्पेट डांबरीकरण करण्याचे काम अर्थ संकल्पात मंजूर झाले आहे.या रस्त्यातील गावे असलेल्या ठिकाणी काँक्रीटीकरण आणि अन्य रस्त्यावर कार्पेट डांबरीकरण केले जाणार आहे.उन्हाचा प्रभाव हा मे महिन्यात जास्त असतो,पण मे महिन्यात कधीही अवकाळी पाऊस होऊ शकतो.त्यामुळे राज्यात कुठेही १५ मे नंतर डांबरीकरण करण्यावर निर्बंध आहेत.मात्र कर्जत तालुक्यातील कोठिंबे आंबिवली जामरुंग रस्त्यावर मंजूर असलेले डांबरीकरण ठेका मिळविणाऱ्या ठेकेदाराने १८ मे रोजी करण्याचा प्रयत्न केला.परंतु त्या दिवशी या भागात प्रचंड प्रमाणात अवकाळी पाऊस सुरू होता. परंतु निधी लाटण्यासाठी ठेकेदाराने सुरू असलेल्या अवकाळी पावसाचा विचार न करता डांबरीकरण काम सुरू केले आणि तब्बल एक किलोमिटर पेक्षा अधिक लांबीचा रस्ता डांबरीकरण केला.
भर पावसात केलेले डांबरीकरण टिकाव धरणार का? हा मोठा प्रश्न असून ठेकेदाराने आणि त्या कामावर नियंत्रण असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाने कशेले खांडस, आंबिवली भागात आठ दिवस सतत सुरू असलेला अवकाळी पाऊस लक्षात घेवून डांबरीकरण करण्याचा घाट घालण्याची अजिबात आवश्यकता नव्हती.मात्र तरी देखील कार्पेट डांबरीकरण करण्याचा प्रयत्न केला आणि डांबरीकरण केले जात असताना सुरू असलेला अवकाळी पाऊस यांचे व्हिडीओ समाज माध्यमात व्हायरल झाले आणि ठेकेदाराची चलाखी जनतेसमोर आली.
या रस्त्याची दोन दिवसांनी पाहणी केली असताना कोठिंबे आंबिवली भागातील आनंदवाडी खानंद भागातील तयार झालेल्या एक किलोमिटर रस्त्याच्या डांबरीकरणाचे कामाची अवस्था दयनीय आहे.आनंद वाडी फाटा भागातून कशेले कडे येणाऱ्या रस्त्यावरील डांबरी थर पावसाच्या पाण्यात निघून गेला आहे.या डांबरीकरण कामासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याचे लाखो रुपये पाण्यात गेले आहेत.त्यामुळे १५ मे नंतर डांबरीकरण करण्याची परवानगी देणाऱ्या बांधकाम खात्याला देखील जाब विचारण्याची गरज आहे.
संबंधित रस्त्याचे काम पावसाचा जोर कमी झाल्यावर पुन्हा डांबरीकरण करून घेतले जाणार आहे.मात्र रस्त्यावरील डांबरीकरण करण्याचा निर्णय चुकीचा होता, अशी प्रतिक्रिया उप अभियंता सार्वजनिक बांधकाम विभागाचे संजीव वानखेडे यांनी दिली.