
Baramati Plane Crash News,
Baramati Plane Crash : बारामतीत पुन्हा एकदा विमान अपघात झाल्याची बातमी समोल आली आहे. गोजुबावी गावच्या जवळ रेडबर्ड फ्लाईट अॅकॅडमीचे एक शिकाऊ विमान कोसळले. अर्धा तासापूर्वी झालेल्या या अपघातात विमानाचे मोठे नुकसान झाले असले तरी विमानातील शिकाऊ वैमानिक सुरक्षित असल्याची प्राथमिक माहिती आहे. बारामतीत सातत्याने होणाऱ्या या विमान अपघातांच्या मालिकांमुळे प्रशिक्षणादरम्यानच्या तांत्रिक सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. घटनास्थळी स्थानिक नागरिक आणि मदतकार्य पोहोचले आहे.
प्राथमिक माहितीनुसार, रेड बर्ड कंपनीचे हे दोन आसनी प्रशिक्षण विमान तांत्रिक बिघाडामुळे गोजुबाबी गावाजवळ कोसळले. उड्डाणादरम्यान विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड झाला होता. वैमानिकाने प्रसंगावधान दाखवत सुरक्षित लँडिंगचा प्रयत्न केला, मात्र बारामतीच्या गोजुबाबी परिसरात विमानाचे जोरदार लँडिंग झाले. या अपघातात कोणतेही मोठे नुकसान किंवा जीवितहानी झालेली नाही. स्थानिक रहिवाशांनी विमान वेगाने खाली येताना पाहिले, तेव्हा घटनास्थळी मोठी गर्दी जमली होती. माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासकीय पथकेही घटनास्थळी दाखल झाली. एक तांत्रिक पथक सध्या विमानाची तपासणी करत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जानेवारी महिन्यात ज्या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान कोसळले होते. ज्या अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला होता. त्याच ठिकाणी पुन्हा एकदा विमान कोसळल्याने संपूर्ण बारामतीत पुन्हा एकदा चिंतेचे सूर उमटू लागले आहेत. प्रशिक्षण कर्तव्यावर असलेल्या वैमानिकाच्या लक्षात सकाळी ८:४० च्या सुमारास गोजुबावी गावाजवळ विमानात तांत्रिक बिघाड झाला. त्यानंतर अवघ्या काही मिनिटातचहा अपघात झाला.
महत्त्वाची बाब म्हणजे वैमानिकाने प्रसंगावधान राखत विमान निवासी भागापासून दूर नेण्याचा प्रयत्न केला. पण विमानाचे इंजिन बंद पडले. पण विमान कोसळण्यापूर्वीच तो विमानातून बाहेर पडला. यात कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नाही. स्थानिक आणि पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी तपास सुरू केला आहे.
यापूर्वी याच गावात झालेल्या विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला होता. २८ जानेवारी रोजी, व्हीएसआर व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेडद्वारे चालवले जाणारे बॉम्बार्डियर लिअरजेट ४५ विमान बारामती विमानतळाजवळ कोसळले होते. विमान मुंबईहून बारामतीला जात होते आणि त्यात अजित पवार व इतर चार जण होते, ज्यांचा अपघातात मृत्यू झाला.
अजित पवार यांच्या मृत्यूनंतर जवळपास चार महिन्यांनी, बंगळूर पोलिसांनी त्यांचे पुतणे रोहित पवार यांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे ‘झिरो एफआयआर’ नोंदवला आहे. रोहित पवार यांनी राज्य सरकार गंभीर आरोप केले आहेत. काका अजित पवार यांना संपवण्यासाठीच हा अपघाताचा कट रचला गेल्याचा गंभीर आरोप रोहित पवार यांनी केला आहे. या अपघाताची २६ फेब्रुवारी रोजी बारामती पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. पण पोलिसांनी FIR नोंदवून घेतला नाही. सुरक्षा नियमांचे पद्धतशीर उल्लंघन आणि कामकाजातील घोर निष्काळजीपणामुळे हा अपघात झाल्याचा आरोप रोहित पवारांकडून करण्यात आला आहे.