
बीडकरांचं पुणे कनेक्शन अखेर सुरू! बीड-पुणे रेल्वेला हिरवा झेंडा
मराठवाड्यातील बीडकरांसाठी आजचा दिवस खास ठरला आहे. बीड-पुणे रेल्वेचा आज शुभारंभ करण्यात आला. राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि बीडच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते रेल्वेला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. त्यानंतर बीडहून ही रेल्वे पुण्याच्या दिशेने रवाना झाली.
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर बीडमधून पहिल्यांदाच पुण्यासाठी रेल्वे धावली, त्यामुळे बीडकरांमध्येही उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं. याआधी बीड-अहिल्यानगर रेल्वे सुरू झाल्याने जिल्ह्याचं रेल्वे कनेक्शन प्रत्यक्षात आलं होतं. आता पुण्याशी थेट रेल्वे जोडणी झाल्याने प्रवासाचा आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे.
यावेळी बोलताना सुनेत्रा पवार यांनी बीडच्या रेल्वे प्रवासाच्या आठवणी सांगितल्या. गेल्या वर्षी 17 सप्टेंबर 2025 रोजी बीड-अहिल्यानगर रेल्वे सुरू झाली होती. त्यावेळी अजित पवारांनी पुढच्या वर्षी बीडहून थेट पुण्याला जाता येईल, असा शब्द दिल्याचा उल्लेख सुनेत्रा पवारांनी केला.
दणदणाट करणाऱ्या डीजेला पुणे पोलिसांचा दणका; तब्बल 14 लाखांचा ट्रक-साउंड सिस्टीम जप्त
अजित पवारांच्या दूरदृष्टीमुळे आणि सरकारकडून मिळालेल्या निधीमुळे हा टप्पा गाठता आला, असं त्यांनी सांगितलं. “अजितदादांनी बीडकरांना दिलेला शब्द पाळण्याचं भाग्य मला मिळालं,” असं म्हणत त्यांनी या प्रकल्पातील अजित पवारांच्या योगदानाचा उल्लेख केला.
पुणे आणि पश्चिम महाराष्ट्राशी रेल्वे कनेक्टिव्हिटी वाढल्याने बीडच्या व्यापारी वर्गाला फायदा होण्याची अपेक्षा आहे. प्रवाशांसोबतच व्यापार, शिक्षण आणि रोजगारासाठी पुण्याकडे जाणाऱ्या नागरिकांसाठीही ही रेल्वे महत्त्वाची ठरणार आहे.
बीडचा विकास आणि कनेक्टिव्हिटी हा आपला ध्यास असल्याचं सांगत सुनेत्रा पवार यांनी पुढील काळातही रेल्वे सुविधांसाठी प्रयत्न करण्याचं आश्वासन दिलं.
साखर कारखान्याला मिळणार आता सॉफ्ट लोन; पोफाळीच्या वसंत साखर कारखान्यालाही अनुदान
खासदार बजरंग सोनवणे यांनी मांडलेल्या मागण्यांचा उल्लेख करत बीड ते पनवेल थेट रेल्वे प्रवासासाठीही प्रयत्न करणार असल्याचं सुनेत्रा पवार यांनी सांगितलं. अधिकाऱ्यांकडून काम करून घेण्याचं आश्वासन देत त्यांनी बीड आणि संपूर्ण मराठवाड्याच्या विकासासाठी एकत्रित प्रयत्न करण्याचं आवाहन केलं.
त्यामुळे बीड-पुणे रेल्वेनंतर आता बीड-पनवेल कनेक्टिव्हिटीच्या मागणीकडे बीडकरांचं लक्ष लागलं आहे.