
Wai taluka Boriv Akoshi road accident risk 2026, Satara PWD negligence road repair
विशेषतः दुचाकीस्वार, शालेय विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना या मार्गावरून जाताना मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. किरकोळ अपघातांची संख्या वाढत असून, एखादी मोठी दुर्घटना घडल्याशिवाय प्रशासनाला जाग येणार नाही का, असा संतप्त सवाल ग्रामस्थ उपस्थित करत आहेत.
ग्रामस्थांच्या मते, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गलथान आणि बेजबाबदार कारभारामुळे रस्त्याची साईडपट्टी पूर्णपणे उखडली गेली आहे. पावसाळा तोंडावर आला असताना परिस्थिती आणखी भीषण होण्याची शक्यता असून, खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यास मोठे अपघात होऊ शकतात. तरीदेखील संबंधित विभागाकडून कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही.
या गंभीर समस्येबाबत ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन देऊन तातडीने दुरुस्तीची मागणी केली आहे. तसेच या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी सातारा, तहसीलदार वाई, वाई पोलीस स्टेशन, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनाही पाठविण्यात आल्या आहेत.
ग्रामस्थांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, प्रशासनाने तातडीने साईडपट्टी दुरुस्तीचे काम हाती घेतले नाही तर तीव्र लोकआंदोलन छेडण्यात येईल. संभाव्य अपघातांमध्ये जीवितहानी झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागावर राहील, असा इशाराही नागरिकांनी दिला आहे.
“अपघात झाल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा अपघात होण्यापूर्वीच प्रशासनाने जागे होणे गरजेचे आहे. बोरीव-आकोशी रस्त्यावरील धोकादायक स्थितीकडे दुर्लक्ष करणे म्हणजे नागरिकांच्या जीवाशी खेळण्यासारखे आहे,” अशी तीव्र प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.