
Chandrapur News: अनियमित पावसाचा फटका! चंद्रपुरात शेतीचे गणित बिघडले; खरीप पिकेही धोक्यात
जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी खरीप पिकांची पेरणी पूर्ण झाली असली तरी काही भागात उशिराने पाऊस झाल्याने पेरणी जुलैच्या दुसऱ्या व तिसऱ्या आठवड्यापर्यंत सुरू होती. ज्या शेतांमध्ये अतिवृष्टीमुळे पाणी साचले, तेथे दुबार पेरणीची वेळही अनेक शेतकऱ्यांवर आली. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात धानाची लागवड केली जाते. यावर्षी पावसाचा अंदाज पाहता धान उत्पादक शेतकऱ्यांनी रोवणीकडे पाठ करत आवत्या टाकण्याला प्राधान्य दिले. दरम्यान पावसाने दडी मारल्यामुळे मोठ्या प्रमाणात धानामध्ये कचरा झाला. कचरा मरण्यासाठी फवारणी करायचा विचार केला तर पाणी नाही, यामुळे फवारणी लांबली.
आठ दिवसापूर्वी पडलेल्या पावसानंतर अनेक शेतकऱ्यांनी फवारणी केली. मात्र कचऱ्याची वाढ झाल्याने दुबार फवारणीची वेळ सध्या शेतकऱ्यांवर आलेली आहे. कपाशीवर तुडतुडे, मावा, पांढरी माशी तसेच गुलाबी बोंडअळीच्या प्रारंभिक हालचाली दिसून येत आहेत. सोयाबीनवर खोडमाशी, पाने गुंडाळणारी अळी व अळीचा प्रादुर्भाव वाढत असून काही ठिकाणी बुरशीजन्य रोगाची लक्षणे दिसत आहेत. धान पिकातही पाण्याच्या साच्यामुळे करपा व इतर रोगांचा धोका वाढला आहे. कीड नियंत्रणासाठी शेतकरी कृषी विभागाच्या मार्गदर्शनानुसार फेरोमोन ट्रॅप, पिवळे चिकट सापळे, संतुलित खत व्यवस्थापन तसेच शिफारशीनुसार कीटकनाशकांची फवारणी करीत आहेत. यंदा तण नियंत्रणासाठी मजुरांची टंचाईही प्रकर्षाने जाणवत असून मजुरीचे दर वाढल्याने उत्पादन खर्चात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे आधीच हवामानाच्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी अधिक वाढली आहे.
यावर्षी पावसाचा अंदाज पाहूण धान रोवणीच्या ऐवजी आवत्याचा पर्याय स्वीकारला. मात्र कचरा वाढण्याच्या दिवसात पाऊस न पडल्याने फवारणी लांबली. पाऊस पडल्यानंतर फवारणी केली असता कचऱ्याची वाढ झाल्याने कचरा तसाच असल्याने चिंता वाढली. कचऱ्यासाठी दुबार फवारणी करण्याची वेळ आली आहे.
यंदा मान्सूनच्या अनियमिततेमुळे पिकांवर कोणताही मोठा प्रभाव पडलेला नाही. जर काही पिकामध्ये रोग लागल्यास शेतकऱ्यांनी नेहमी शेत पाहणी करून किडीचा प्रादुर्भाव आढळताच कृषी विभागाच्या शिफारशीनुसार उपाययोजना कराव्यात, अनावश्यक कीटकनाशकांचा वापर टाळावा आणि कृषी सहाय्यकांचा सल्ला घ्यावा.- शंकर तोटावार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, चंद्रपूर
चंद्रपूर जिल्ह्यात यंदा सुरूवातीपासूनच पावसाने दडी मारली. जुलै महीन्याच्या शेवटी काही प्रमाणात पाऊस पडला असला तरी आतापर्यंत सरासरीच्या केवळ ८० टक्के पावसाची नोंद झाली आहे. जुन महीन्यामध्ये सरासरीच्या ५८.३ टक्के, तर जुलै महिन्यात सरासरीच्या ९१.२ टक्के पाऊस पडला. सर्वाधिक पावसाची नोंद बल्लारपूर तालुक्यात झालेली असून, ती सरासरीच्या १६३.२ टक्के एवढी आहे. तर सर्वात कमी पावसाची नोंद राजूरा तालुक्यात झाली असून सरासरीच्या केवळ ६२.१ टक्के पाऊस पडला आहे.