मिरा रोड: ठाणे-घोडबंदर मार्गावरील फाऊंटन ते गायमुख या रस्त्यावरील जीवघेण्या खड्ड्यांच्या प्रश्नावरून मिरा-भाईंदरमधील राजकारण पुन्हा तापले आहे. महापौर डिंपल विनोद मेहता यांनी हा रस्ता मिरा-भाईंदर महानगरपालिकेमार्फत दुरुस्त न करता शासनाकडूनच दुरुस्ती करून घ्यावी, अशी भूमिका घेत आयुक्तांना पत्र दिल्यानंतर शिवसेनेने त्यावर तीव्र आक्षेप घेत आक्रमक पवित्रा स्वीकारला आहे.
महापौरांनी आयुक्तांना दिलेल्या पत्रात, फाऊंटन ते गायमुख हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे (पीडब्ल्यूडी) पुन्हा हस्तांतरित करण्याचा महासभेचा ठराव अद्याप अस्तित्वात असल्याचे नमूद केले आहे. महापालिकेची आर्थिक परिस्थिती बिकट असून शहरातील अनेक अंतर्गत रस्त्यांवरील खड्डे दुरुस्त करण्यासाठीही निधी अपुरा असल्याने या मार्गाची दुरुस्ती शासनानेच करावी, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे. महासभेच्या ठरावानुसारच कार्यवाही करण्याची मागणीही त्यांनी प्रशासनाकडे केली आहे.
मात्र, या भूमिकेवर शिवसेनेने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. माजी विरोधी पक्षनेते तथा शिवसेना जिल्हाप्रमुख यांनी वसई-विरार पोलीस आयुक्तांना निवेदन देत महापौरांनी रस्त्याच्या दुरुस्तीला अडथळा आणल्याचा आरोप केला आहे. तसेच महापौर आणि महापालिका आयुक्तांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
शिवसेनेच्या निवेदनानुसार, वाहतूक पोलिसांनी तातडीने खड्डे बुजवण्याबाबत महापालिकेला पत्र दिले असूनही प्रशासनाने प्रभावी कारवाई केली नाही. त्यामुळे नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे. पुढील ४८ तासांत फाऊंटन-गायमुख मार्गावरील खड्डे बुजवले नाहीत, तर शहरभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही शिवसेनेने दिला आहे.
दरम्यान, फाऊंटन-गायमुख रस्त्यावरील खड्ड्यांचा प्रश्न आता केवळ पायाभूत सुविधांचा न राहता राजकीय वादाचा विषय बनला असून, या प्रकरणात महापालिका प्रशासन आणि सत्ताधारी-शिवसेना यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.






