
आणखीन खातेदारांचे आधार संलग्निकरण व अन्य प्रक्रिया पार पडल्यावर या संख्येत वाढ होऊ शकते, असेही मोघे यांनी सांगितले आहे. जिल्ह्यात अद्याप ७१२ खातेदार असे आहेत की ज्यांचे बँक खाते आधार संलग्न नाही, असे निदर्शनास आले आहे. त्यात बँक ऑफ इंडिया-१, बँक ऑफ बडोदा-४८४, बँक ऑफ महाराष्ट्र-१६२, सेंट्रल बैंक ऑफ इंडिया-२, जिल्हा मध्यवर्ती बँक-५, महाराष्ट्र ग्रामिण बैंक-१२, स्टेट बैंक ऑफ इंडिया-४०, युनियन बैंक ऑफ इंडिया-६ असे एकूण ७१२ खातेदार आहेत. या खातेदारांनी तत्काळ आपल्या बँकेशी संपर्क साधून आधार संलग्निकरण करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक मोघे यांनी केले.
ज्या शेतकऱ्यांची थकबाकी दोन लाख रुपयांपेक्षा अधिक आहे, त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे. अशा शेतकऱ्यांनी अतिरिक्त रक्कम संबंधित बँकेत जमा केल्यानंतर शासनाकडून दोन लाख रुपयांपर्यंतची रक्कम ओटीएस अंतर्गत अदा केली जाईल. २०१९ च्या कर्जमाफीचे लाभार्थी असल्यास ५० हजार रुपयांपेक्षा जास्त थकबाकीतील अतिरिक्त रक्कम शेतकऱ्यांनी भरल्यानंतरच त्यांना ५० हजार रुपयांचा ओटीएस लाभ मिळेल. शेतकऱ्यांना त्यांचा हिस्सा भरण्यासाठी ३१ मार्च २०२७ पर्यंत मुदत देण्यात आली आहे.
१ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत अल्पमुदत पीक कर्ज घेतलेल्या आणि ३० सप्टेंबर २०२५ अखेर थकीत असलेल्या तसेच ३१ मार्च २०२६ पर्यंत कर्जाची परतफेड न केलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. एका किंवा अनेक बँकांमधील सर्व पात्र कर्जखात्यांवरील मुद्दल व व्याजासह एकूण थकबाकीची कमाल दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी दिली जाणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी यापूर्वी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना, २०१९ चा लाभ घेतला आहे, त्यांना या नव्या योजनेत कमाल ५० हजार रुपयांपर्यंतच कर्जमुक्तीचा लाभ मिळणार आहे.